छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठ प्रशासनाच्या अडमुठ्या धोरणावर प्रहार करताना सदस्य डॉ. उमाकांत राठोड यांनी काय हे नाटक शब्द उच्चारला. नाटक हा शब्द असंवैधानिक असल्याचा वार प्रशासनाने केला. यावर प्रत्युतर म्हणून कुलगुरुंनी हे काय सर्व गाढव आहेत का ? असा शब्द वापरला. यावर सदस्यांनी गाढव शब्द संवैधानिक आहे का, असा पलटवार करत सर्वच सदस्य आक्रमक झाले. सदस्यांची आक्रमकता पाहून कुलगुरुंनी माघार घेत शब्द मागे घेतले. पूर्ण सभेत विद्यार्थ्यांचे हित राहिले बाजूला निव्वळ गोंधळात विद्यापीठाची अधिसभा मंगळवारी (दि.३०) पार पडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अधिसभा मंगळवारी कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेत पार पडली. दरम्यान, अनेक दिवसांपासून ही अधिसभा वादळी ठरणार, अशी चर्चा सुरू होती. सदस्यांकडून प्रशासनांच्या हुकूमशाहीसह सदस्यांनी दिलेल्या प्रस्तावांचा समावेश न करता, ठराविक प्रस्तावच विचारात घेतल्याने वाद सुरू झाला होता. हा वाद बैठकीत उफाळून आला. प्र-कुलगुरु डॉ. वाल्मीक सरवदे यांनी विद्यापीठाचे उपक्रम वाचण्यास सुरुवात केली. यावर सदस्यांनी आक्षेप घेत गुऱ्हाळ बंद करा, केवळ प्रश्नांचे उत्तर द्या म्हणत सदस्य आक्रमक झाले. विद्यापीठाची एनआयआरएफ रैंकिंग का घसरली, यावर सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, पूर्ण सभेत सदस्यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अश्रूचा विसर पडल्याचे दिसून आले. काही काळ आक्रमक झाल्यानंतर पुन्हा मात्र हसत खेळत बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
तपासणीत भेदभाव
प्रा. सुनील मगरे यांनी पदव्युत्तर महाविद्यालयांच्या तपासणीत भेदभाव केल्याचा आरोप केला. एक रिपोर्ट पॉजिटीव्हअसताना दुसरा रिपोर्ट परीक्षा निगेटिव्ह कसा, सुविधा असतानाही चांगल्या शिक्षण संस्थांना बदनाम केल्याचेही यावेळी आरोप केला. त्याचबरोबर ऑक्टोबरपर्यंत प्रवेश आणि डिसेंबरमध्ये विद्यापीठाचे अकॅडमिक कॅलेंडरचे तीनतेरा झाल्याचेही म्हणाले. डॉ. राठोड यांनी विद्यापीठ गीताचा विस्तार करण्यावर मत मांडले. त्यावर त्यासाठी एक प्रक्रिया असते. राज्यपाल कार्यालयास कळवून तज्ज्ञांच्या मदतीने करावे लागेल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
अतिवृष्टीचा विसर नको
कुलगुरु, प्रकुलगुरु विद्यार्थ्यांना भेटत नाहीत, असा प्रश्न ॲड. दत्ता भांगे यांनी उपस्थित करत मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. त्याचा विसर नको. परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी केली. त्यावर कुलगुरु यांनी शासनाकडे शिफारस करू, असे उत्तर दिले. तर रिचेकिंगचा निकाल वेळेत लागत नसल्यानेही सदस्यांनी परीक्षा संचालक डॉ. डोळे यांना डोळे उघडे ठेवून संबंधितांवर कारवाई करा, असे सांगत धारेवर धरले.
प्रशासनाची दमछाक
अधिसभेत सुरुवातीपासूनच सदस्यांनी आक्रमता दाखवल्याने प्रशासनाची चांगलीच गोची झाली. नाटक आणि गाढव शब्दावरून वाढलेला गोंधळ थांबवता थांबवता प्रशासनाला घाम फुटला होता. यातच खाली बसा, तुम्ही बोलू नका, गप्प बसा या शब्दांतच तब्बल २० मिनिटांपेक्षाही जास्त वेळ गोंधळात गेला.