सुमित पवार
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी खून केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अक्षरशः ‘दृश्यम’ चित्रपटासारखा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेतील मयत राजाराम उत्तम लोंढे हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.
नोकरीनिमित्त ते कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर शहरात राहत होते. विशाल राठोड आणि आकाश पवार हे त्यांचे दोघे शहरात त्यांचे चांगले मित्र होते आणि ते नेहमी एकत्र फिरत असत. या दोघांनी “खतरों के खिलाडी”सारखा खेळ सुरू करायचा असल्याचे सांगत लोंढे यांच्याकडून मोठी रक्कम घेतली होती. मात्र पैसे परत देणे शक्य नसल्याने त्यांनी हत्या करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपींनी खोदले खड्डे
पूर्वनियोजित कटानुसार आरोपींनी गेवराई तांडा परिसरात JCB च्या सहाय्याने सुमारे पाच फूट खोल असे दोन खड्डे खोदून ठेवले होते. हत्येच्या दिवशी आरोपींनी लोंढे यांना सोबत घेऊन दौलताबाद परिसरात दारू पार्टी केली. त्यानंतर परतत असताना लोंढे यांच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तुलातूनच आरोपींनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लोंढे यांना घेऊन आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याचा बनाव रचला. त्यानंतर त्यातील एका खड्डयात लोंढे यांना पुरले
यावेळी मृत प्राध्यापकांचा मोबाईल वारंवार ऑन-ऑफ करण्यात आला. तसेच त्यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याची खोटी माहितीही देण्यात आली. दरम्यान ६ फेब्रुवारी २०२६ रोजी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी मयताचे बंधू उत्तम लोंढे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन विशाल राठोड आणि आकाश पवार यांच्यावर संशय व्यक्त केला. यानंतर पोलिसांनी दोघांची चौकशी सुरू केली.
चौकशीदरम्यान आकाश पवार वारंवार “मी दारू प्यायलो होतो, मला काही आठवत नाही” असे सांगत होता. मात्र पोलिसांनी विशाल राठोड याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी सांगितले की, लोंढे हे पैसे परत मागत होते आणि वारंवार अपमान करत होते. त्यामुळे रागातून त्यांनी हत्येचा कट रचला. खून केल्यानंतर मृतदेह एक दिवस गाडीत ठेवण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री करण आडे या साथीदाराच्या मदतीने गेवराई तांडा परिसरातील आधी खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली असून प्राथमिक माहितीनुसार सुमारे ५० लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृत प्राध्यापकांचा मोबाईल पुण्यात नेऊन सुरू केला आणि “मला कुणी त्रास देऊ नका, मी २५ ते ३० दिवस येणार नाही” असा स्टेटस ठेवून फोन बंद केल्याचेही तपासात उघड झाले, मी त्यावरून पोलिसांना त्यांचा संशय आला. त्याबाबत संपूर्ण माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली आहे.