छत्रपती संभाजीनगर : बुलेट गाडीची चावी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान मुकुंदवाडीतील जयभवानी नगर भागात दोन गटांतील कोयता व चाकूहल्ल्यात झाले. एका गटाने घरात घुसून महिलेसह तिच्या मुलावर कोयत्याने हल्ला केला, तर दुसऱ्या गटाने 'माझ्या भावाला मारतो का?' असा जाब विचारत तरुणावर भररस्त्यात चाकूने वार केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात पवन ओमप्रकाश बुधवंत (वय १९, रा. गल्ली नं. १४, जयभवानी नगर) याने फिर्याद दिली आहे. ३१ ऑगस्ट रोजी पवनच्या मावशीची बुलेट गल्लीत उभी असताना आरोपी प्रज्वल ऊर्फ सोनू अहिरे आणि आशु मोरे यांनी गाडीची चावी मागितली होती. चावी न दिल्याने त्यांनी दगडाने बुलेटची तोडफोड केली. यावरून पवनच्या वडिलांनी १ सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी पोलिसांत तक्रार दिली. आपल्याविरुद्ध तक्रार केल्याचा राग मनात धरून २ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सोनू अहिरे, प्रणव अहिरे आणि आशु मोरे यांनी पवनच्या घरावर दगडफेक करून काचा फोडल्या.
त्यानंतर शिवीगाळ करत घरात घुसून त्यांनी सामानाची तोडफोड सुरू केली. पवनची आई मध्यस्थीसाठी आली असता प्रणवने त्यांच्यावर कोयता उगारला, जो त्यांच्या हाताला लागला. पवन त्यांना वाचवायला गेला असता त्याच्यावरही कोयत्याने वार झाल्याने तो जखमी झाला. त्यानंतर तिघांनी माय-लेकाला दांडक्याने बेदम मारहाण केली. या वेळी कोणीतरी '११२' क्रमांकावर संपर्क साधल्याने पोलिसांचे वाहन सायरन वाजवत घटनास्थळी आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी तेथून पळ काढला. या प्रकरणी सोनू अहिरे, प्रणव अहिरे आणि आशु मोरे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'माझ्या भावाला मारतो का?' म्हणत चाकू आणि दगडाने वार
दुसऱ्या प्रकरणात आशिष नंदू मोरे (वय १९, रा. साई कॉलनी, मुकुंदवाडी) याने पवन बुधवंत आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली आहे. आशिष १ सप्टेंबरच्या मध्यरात्री मित्राच्या घरभरणीच्या कार्यक्रमावरून पायी घरी परतत होता. रात्री २ च्या सुमारास झेंडा चौकाजवळ पवन बुधवंत, बाळ्या बुधवंत, बळी पाटील आणि सावऱ्या यांनी त्याला गाठले. 'काय रे, तू जास्त मस्तीत आलास का, माझ्या भावाला मारतोस का?' असा जाब विचारत बाळ्या बुधवंत याने आशिषला शिवीगाळ सुरू केली.
या वेळी पवनने आशिषच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केले, तर सावऱ्याने त्याच्या हातावर चाकूने वार केले. या हल्ल्यातून कशीबशी सुटका करून आशिषने तिथून पळ काढला. या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी पवन बुधवंत, बाळ्या बुधवंत, बळी पाटील आणि सावऱ्या या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.