छत्रपती संभाजीनगर : शासनाच्या मिशन सुधार मोहिमेंतर्गत जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात तब्बल १ लाख ७ हजार ३८२ कार्ड चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. यात विविध निकषानुसार सुमारे २० हजार कार्डधारकांचे रेशन धान्य कायमचे बंद होणार असल्याचे संकेत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली. यापूर्वी १८ हजार कार्डधारकांची धान्यसेवा बंद झाली आहेत.
शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे कार्डधारकांची तपासणी करण्यात येत आहे. यात दुबार कार्डधारक, निकषबाह्य आणि निष्क्रिय लाभधारक कार्डाचा लाभ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील तब्बल १८ हजार कार्डधारकांचे धान्य कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहेत. त्यात आता मिशन सुधारच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल १ लाख ७ हजार ३८२ लाभार्थीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेत विविध निकषांनुसार लाभार्थीच्या नोंदींची तपासण्यात येत आहेत.
यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक ४५ हजार १४२ सायलेंट बेनिफिशियरीज आढळले आहेत. त्याखालोखाल ६ लाखांपेक्षा अधिक उलाढाल अथवा उत्पन्न असलेले, इन्कम टॅक्स भरणा करणारे, पॅन, आरटीजीएस असतानाही स्वस्त धान्याचा लाभ घेत असलेल्यांची या मोहिमेत तपासणी करण्यात येत आहे. यात अपात्र ठरणाऱ्याचे धान्य बंद करण्यात येत आहे. जिल्ह्यात असे सुमारे २० हजार कार्डधारक दुसऱ्या टप्प्यात निघतील, असे संकेत जिल्हापुरवठा अधिकारी फुलारी यांनी दिले.
६ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न
जिल्ह्यात मिशन सुधार अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत दुसऱ्या टप्प्यात सुमारे ४० हजार ५५५ नोंदी या ६ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांची आहे. यात शहरातील १५ हजार १३८ रेशन कार्डधारकांचा समावेश आहे. तर ४ हजार ८०८ कार्डधारकांच्या नोंदी आधारस्थितीशी संबंधित नोंदी आहेत.
१०० वर्षांपेक्षा अधिक वय
जिल्ह्यात २३८ कार्डाधारक सदस्यांनी शंभरी (सेंच्युरी) पार केली आहे. त्यात सर्वाधिक ६० कार्डधारक सदस्य हे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील आहेत. ४९ गंगापूरमधील तर २६ वैजापूरमधील आहे.
४५ हजार सायलेंट लाभार्थी
जिल्ह्यात धान्याचा लाभ घेणाऱ्यांपैकी तब्बल ४५ हजार कार्डधारकांनी अनेक महिन्यांपासून धान्याचा लाभच घेतलेला नाही, अशा या सायलेंट लाभार्थीमध्ये संभाजीनगर शहरात सर्वाधिक १४ हजार २७६ कार्डधारक आहेत. तर कन्नडमध्ये ५ हजार ४५, पैठणमध्ये ७ हजार ४१४, वैजापूरमध्ये ४ हजार ५७३ आहे.