छत्रपती संभाजीनगर : 'सव्र्व्हर डाऊन'चे कारण पुढे करत 'ऑफलाईन' पद्धतीने होणाऱ्या बोगस रजिस्ट्रींचे रॅकेट शहरात चांगलेच फोफावले आहे. यातच आता एका ८० वर्षीय वृद्धेच्या जागी चक्क दुसरीच तोतया महिला उभी करून भूमाफियांनी कोट्यवधी रुपयांचा प्लॉट हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सह दुय्यम निबंधकांच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.२९) सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, भूमाफियांच्या या संघटित 'सिंडिकेट' मुळे शहरात खळबळ उडाली आहे.
कोतवालपुरा येथील व्यंकटेश शिक्षण संस्थेच्या मालकीचा प्लॉट संस्थेच्या अध्यक्षा मालती खानापूरकर (८०, रा. बजरंग चौक, सिडको एन ६) यांच्या नावावर आहे. १३ सप्टेंबर २०२४ रोजी सह दुय्यम निबंधक (क्र. १) कार्यालयात एका अनोळखी महिलेला 'मालती खानापूरकर' भासवून उभे करण्यात आले. या तोतया महिलेने मालेगावचा नादिमोद्दीन अलीयुद्दीन शेख याला प्लॉटचे बनावट कुलमुखत्यारपत्र लिहून दिले. या बनावट दस्ताच्या आधारे अवघ्या २० दिवसांत, म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी, नादिमोद्दीनने हा प्लॉट खुलताबादच्या शेख लतीफोद्दीन इस्माईलोद्दीन आणि अजहर खान गौस खान यांना विकून टाकला.
मूळ मालक मालती खानापूरकर यांना हा प्रकार समजताच त्यांनी तक्रारीसाठी धाव घेतली. यावरून सह दुय्यम निबंधकांच्या फिर्यादीवरून बनावट मुखत्यारपत्र घेणारा नादिमोद्दीन, खरेदीदार शेख लतीफोद्दीन, अजहर खान, साक्षीदार सलीम मुर्तुजा शेख, शेख अथर शेख अख्तर, शेख अनीस शेख शफीयोद्दीन आणि एका तोतया महिलेवर भारतीय न्याय संहिता व नोंदणी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
विशेष म्हणजे, अशा प्रकरणांत दुय्यम निबंधक स्वतः फिर्यादी होतात; पण प्रत्यक्ष पोलिसांत जाऊन गुन्हा दाखल करायला विलंब करतात. कोतवालपुरा प्रकरणातही मूळ मालकाने १८ डिसेंबर २०२४ रोजीच तक्रार केली होती. त्यानंतर सुमारे दीड वर्षानंतर गुन्हा दाखल झाला आहे. हा वेळकाढूपणा नेमका कोणाच्या फायद्यासाठी? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. हिरापूर प्रकरणातही असाच प्रकार समोर आला होता, आता या माफियांची पाळेमुळे खणून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सर्व्हर डाऊन'चे रॅकेट
शहरात बोगस रजिस्ट्रीचे तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत. महिनाभरात होणाऱ्या तीन हजारपैकी दोन हजार रजिस्ट्री केवळ 'ऑफलाईन' होतात. दस्त नोंदणी ऑनलाईन असताना मूळ मालकाची आधार पडताळणी (बायोमेट्रिक) सक्तीची असते, मात्र, 'सर्व्हर डाऊन'चा बहाणा करून भूमाफिया ऑफलाईन रजिस्ट्रीची भयानक पळवाट शोधतात. परगावी असलेल्या नागरिकांच्या मालमत्तांवर याच त्रुटीचा फायदा घेत डल्ला मारला जात आहे.