हतनूर; पुढारी वृत्तसेवा : धुळे-सोलापूर महामार्गावरील कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील जुन्या पुलाच्या शिवना नदी पात्रात तालुक्यातील नावडी येथील गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता आसलेल्या अमोल विलास काकडे (वय २६) या तरुणाचा मृतदेह आज (दि ३) पाण्यावर तरंगताना आढळला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कन्नड शहर पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर रोजी अमोल काकडे बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांसह नातेवाईकांनी अमोलचा बाहेर गावाच्या नातेवाईकांकडे, मित्र मंडळीकडे कसुन शोध घेतला पण अमोलचा शोध लागला नाही. मंगळवारी (दि. ३) टापरगावाच्या जुन्या पुलाखाली शिवना नदीच्या पात्रात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आल्याची माहिती हतनुर गावचे पोलीस पाटील प्रकाश पवार यांनी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिली.
घटनेची माहिती मिळतात बीट जमादार कैलास करवंदे, संजय आटोळे, पोलीस मित्र संतोष ढोले, दिनकर राशनकर, मनोज घुटरसिंग रामेश्वर वेताळ हे घटनास्थळी दाखल झाले. यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. नातेवाईकांना बोलावून ओळख पटवुन नदीच्या किनाऱ्यावरच हतनुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत गावंडे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री साडेनऊ वाजता अमोलच्या पार्थिवावर नावडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बीट जमादार कैलास करंवदे, संजय आटोळे करत आहेत.