छत्रपती संभाजीनगर : बेगमपुरा परिसरातील आमखास मैदान रोड आणि जयभीमनगर भागात दोन गटात तुफान राडा झाला. पैशांच्या वादातून एका हॉटेल व्यावसायिकाने रिक्षाचालकाच्या पाठीत चाकू खुपसून जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्या गटाने याच हॉटेल व्यावसायिकाच्या घरासमोर उभ्या असलेल्या फॉर्च्यूनर आणि किया गाड्यांची सहा जणांच्या टोळक्याने मध्यरात्री तोडफोड केली.
या दोन्ही घटनांप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी सहाही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपनिरीक्षक मदेवाड करत आहेत.
घटना १ - पैशांच्या वादातून रिक्षाचालकावर हल्ला
फिर्यादी रिक्षाचालक निखिलेश दगडू गायकवाड (३६, रा. मुकुंदवाडी, संघर्षनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी हॉटेल व्यावसायिक आरोपी देवा ढोले (३३, रा. आदर्श नगर, गुलाबवाडी, जयभीमनगर) याच्याकडून घेतलेले पैसे परत देण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. शुक्रवारी (दि. ११) रात्री ११ वाजेच्या सुमारास कमळ तलाव, आमखास मैदान रोडवर आरोपी देवा ढोले याने निखिलेश यांना शिवीगाळ केली. तसेच धारदार चाकूने निखिलेश यांच्या पाठीवर उजव्या बाजूस सपासप वार करून गंभीर दुखापत केली. निखिलेश जीव वाचवून पळत असताना, माझे पूर्ण पैसे दिले नाही, थांब तुला खतमच करून टाकतो, अशी धमकी देत आरोपीने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना २ - रागाच्या भरात फॉर्च्यूनर, किया कारच्या काचा फोडल्या
या हल्ल्याच्या काही वेळानंतरच, शनिवारी (दि. १२) मध्यरात्री १२.१२ वाजेच्या सुमारास जयभीमनगरमध्ये गाड्यांच्या तोडफोडीची घटना घडली. ज्ञानेश्वर रामदास ढोले (३३, रा. आदर्श नगर, गुलाबवाडी) आणि आरोपी राकेश पंडित यांच्यात मोबाईलवर वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून, राकेश पंडित याच्या सांगण्यावरून आरोपी वैभव त्रिभुवन, भारत खरात (दोघे रा. इंदिरानगर, गारखेडा), सलमान खान, आमु (दोघे रा. दर्गा चौक), शाहीन शेख (रा. शिवशंकर कॉलनी) आणि स्वतः राकेश पंडित (रा. इंदिरानगर) यांनी बेकायदेशीर मंडळी जमवली. या टोळक्याने ज्ञानेश्वर ढोले यांच्या घरासमोर जाऊन त्यांच्या फॉर्च्यूनर आणि किया या महागड्या गाड्यांच्या काचा फोडल्या आणि बोनेटचे नुकसान केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.