छत्रपती संभाजीनगर - खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांचा झालेला करुण अंत ही आत्महत्या नसून, तो निव्वळ एक अपघात होता, असा दावा मयत संगीता चांदगुडे यांच्या लहान बहिणीने (कल्याणी) केला आहे. दुरावलेल्या आई-वडिलांना एकत्र आणण्यासाठी कुणालने बापाला केवळ भावनिक धाक दाखवला होता, असे त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवले असून, 'मृत्यूचे खरे कारण त्या तिघांनाच माहिती' असे सांगत दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरुद्ध कोणतीही तक्रार देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
कुणालने महागड्या आयफोनचा हट्ट केल्याने घरात वाद झाल्याची चर्चा सर्वत्र होती. मात्र, मावशी कल्याणी यांनी माध्यमांसमोर ही बाब स्पष्टपणे फेटाळली आहे. त्यांनी सांगितले की, कुणालच्या शिक्षणासाठी २० ते २५ हजार रुपये रोख देऊन एक जुना (वापरलेला) आयफोन घेतला होता. त्यावर कोणताही मासिक हप्ता नव्हता. खरे कारण हे होते की, मुरलीधर हे मागील काही दिवसांपासून घराबाहेर राहात होते. तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकता ? घरी परत या, अशी विनवणी कुणालने वडिलांना केली होती. आपल्या बापाला घरी परत आणण्यासाठीच त्याची धडपड सुरू होती.
मागील वर्षीचा प्रकार केवळ 'गैरसमज'
कुणालने मागील वर्षीही याच डोंगरावर आत्महत्येचा प्रयत्न केला होता, या चर्चेवरही कल्याणी यांनी पडदा टाकला आहे. तो प्रकार केवळ एक मोठा 'गैरसमज' होता, असे त्या म्हणाल्या. कुणालला काही काळ एकांत हवा होता. त्याने आईला मॅसेज पाठवून मी थोडा परेशान आहे, मला एकांत हवाय, संध्याकाळपर्यंत घरी येईन असे कळवले होते. मात्र, संगीता यांनी तो संदेश वेळेवर पाहिला नाही आणि भीतीने थेट चिकलठाणा पोलिस ठाणे गाठले. रात्री उशिरा पोलिसांसमोर तो संदेश उघड झाला, तेव्हा तो आत्महत्येचा प्रयत्न नव्हता हे स्पष्ट झाले. याची नोंद चिकलठाणा पोलिसांकडे आजही आहे, असा दावा कल्याणी यांनी केला.
तो मृत्यूचा सापळा ठरला; जीवन संपवण्याचा हेतू नव्हता
कुणालचा जीवन संपवण्याचा कोणताही हेतू नव्हता. बापाने घरी परतावे, यासाठी केवळ भावनिक धाक दाखवण्यासाठी तो डोंगराच्या कड्यावर गेला असावा. मात्र, तिथे त्यांची समजूत काढताना आणि ओढाओढीत तोल जाऊन हा दुर्दैवी अपघात घडला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. तसेच, २२-२३ वर्षांचा सुखी संसार अचानक मोडल्याने आणि पती घराबाहेर गेल्याने, सासरच्या मंडळींपर्यंत आपली व्यथा पोहोचवण्यासाठीच संगीता यांनी समाजमाध्यमांचा आधार घेतला होता, असेही कल्याणी यांनी स्पष्ट केले.