पैठण, पुढारी वृत्तसेवा : चालू हंगामात उसाला सर्व साखर कारखानदारांनी ३१०० रुपये दर द्यावा, यासह विविध मागणीसाठी आज (दि.१६) पैठण येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पैठण शहागड फाटा, शेवगाव, पाचोड रोडवर ऊस वाहतूक ठप्प झाल्यामुळे लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी नगर जिल्हा युवक अध्यक्ष ज्ञानदेव मुळे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन केले. यावेळी मराठवाड्यात सामान्यायी धोरणानुसार नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून तात्काळ पाणी न सोडल्यास पैठण धरणातून वेगवेगळ्या ठिकाणी होणारा पाणीपुरवठा बंद करून आंदोलन सुरू करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांना अग्रिम नुकसान पीक विमा, आपेगाव, हिरंडपुरी बंधाऱ्यासह खेर्डा बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे, जिल्ह्यातील साखर कारखान्याचे वजन काटे संगणकीकृत व ऑनलाइन करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनात शिवाजी साबळे, संतोष तांबे, बंडू धरफळे, योगेश घोणे, गणेश भुजबळ, बाबुराव बोरुडे, महेश लांडगे, राहुल लांडगे, संतोष औटे, सतीश नरके, निवृत्ती पैठणे, कृष्णा काळे, अशोक नरके, भाऊसाहेब नरके, उद्धव मापारी, संदीप वाकडे, शिवाजीराव धरपडे, राहुल औटे आदीसह विविध शेतकऱ्यांचा सहभाग होता.