Census to begin in the city from May 1st.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता प्रशासन जनगणनेच्या कामाला जुंपणार आहेत. येत्या १ मेपासून ही प्रक्रियेला सुरुवात होणार असून, या कामासाठी प्रशासनाने ३ हजार ८०० कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती उपायुक्त विकास नवाळे यांनी दिली. तसेच पहिले दोन आठवडे नागरिकांना स्वतः अॅपद्वारे नोंदणी करण्याची संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशभरात येत्या १ मेपासून राष्ट्रीय जन गणनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. त्याबाबत अगोदरच केंद्र शासनाकडून कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. शहरातील जनगणनेची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्यामुळे प्रशासनाने जनगणना कक्ष सुरू करून पूर्वतयारी केली आहे.
यात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्याची कामे सध्या केली जात आहेत. यासंदर्भात विभाग प्रमुख उपायुक्त नवाळे यांनी सांगितले की, जन गणनेच्या कामाला १ मेपासून सुरुवात होणार आहे. परंतु यात पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे या १५ दिवसांत नागरिकांना अॅपवरून स्वतः माहिती भरणा करून नोंदणी करता येईल. या प्रक्रियेनंतर जनगणनेच्या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी घरोघरी जाऊन घरांवर क्रमांक टाकतील.
त्यासाठी शहराचे १० ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, नोंदणीसाठी तयार केलेल्या एका ब्लॉकमध्ये १२० ते १४० घरांची संख्या राहील, असेही सांगण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे ३५०० कर्मचारी लागणार आहे. त्यात राखीव दहा टक्के असे एकूण ३७०० ते ३८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यात शिक्षकांसह महापालिका, शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असेल, असे नवाळे यांनी नमूद केले.
डिजिटल जनगणना होणार
यंदाची जनगणना ही डिजिटल स्वरूपात होणार आहे. यात कुठेच कागदाचा वापर होणार नाही. लवकरच केंद्र शासनातर्फे अॅप दिला जाणार आहे. या अॅपमध्येच नोंदणी करण्यात येणार आहे.
३३ प्रश्न असतील
जनगणेच्या नोंदणीसाठी नागरिकांना ३३ प्रश्न विचारण्यात येतील. अॅपमध्ये त्या प्रश्नांचा समावेश केला आहे. यात घर पक्के की पत्र्याचे, तुमच्याकडे गॅस आहे का? दुचाकी, चारचाकी आहे का, अशी प्रश्न असतील.