BJP wins for the first time in ZP
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदानंतर सभापती पदाच्या निवडीतही भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच आपले निर्विवाद वर्चस्व ठामपणे सिद्ध करत बाजी मारली. बहुमताचे गणित अचूक जुळवत सभापती पदाची निवडणूक बिनविरोध करण्याची किमया साधली. विरोधकांकडून अर्जच दाखल न झाल्याने भाजपचा मार्ग अधिक सुकर झाला. या निवडणुकीसाठी शिवसेना व उबाठा गटाचे सदस्य गैरहजर राहिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात गुरुवारी (दि.२) झालेल्या विषय समिती सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी महाविकास आघाडीकडून उबाठाचे कृष्णा पाटील डोणगावकर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गीतांजली पाथ्रीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला होता.
मात्र ऐनवेळी संख्याबळ जुळत नसल्याने दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केला नाही. परिणामी, निवडणूक बिनविरोध झाली. दरम्यान पीठासीन अधिकाऱ्यांनी सर्व सदस्यांच्या सह्या घेतल्या आणि प्रक्रिया पूर्ण केली. दाखल अजापैकी मीनाक्षी पवार यांची महिला व बालविकास सभापतीपदी, तर बालाजी सोनटक्के यांची समाजकल्याण सभापतीपदी निवड निश्चित झाली आहे. उर्वरित दोन पदांबाबत सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे.
भाजपने आपल्या गटातून मीनाक्षी पवार व अनिता मोटे यांना संधी देत महिला नेतृत्वाला पुढे आणले आहे. महायुतीचा समन्वय साधत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून बालाजी सोनटक्के यांना संधी दिली तर अपक्ष असूनही भाजप पुरस्कृत सचिन गरड यांनाही सभापतीपद देऊन पक्षाने आपली राजकीय पकड अधिक मजबूत केली.
आहे. दरम्यान, दुपारी २ वाजेनंतर या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. पीठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी सकाळी १० ते १२ या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली. एकूण ६ अर्ज वाटप करण्यात आले.
होते, मात्र त्यापैकी केवळ ४ अर्ज दाखल झाले होते. सभापती निवडीच्या घोषणेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच जिल्हा परिषदेत जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
भाजपने शिवसेनेचे डाव उधळले
कालपर्यंत दोन्ही शिवसेना गट एकत्र येऊन भाजपविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र, भाजपने अपक्ष सदस्यांची साथ मिळवत शिवसेनेचे सर्व डाव उधळून लावले. १ खासदार आणि ६ आमदार असूनही शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. येत्या काळामध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार आहे. या विजयामुळे ग्रामीण भागातील भाजपची पकड अधिक घट्ट झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
गंगापूर-वैजापूरचे वर्चस्व ; पैठण, खुलताबाद, सोयगावची पाटी कोरी जिल्हा परिषदेत आता वैजापूर व गंगापूर तालुक्याचे वर्चस्व दिसून येणार आहे. वैजापूर तालुक्याला अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे, तर गंगापूर तालुक्याला समाजकल्याण विभागाचे सभापतीपद मिळाले आहे. तसेच फुलंब्री तालुक्याला उपाध्यक्षपद मिळाले असून छत्रपती संभाजीनगर, कन्नड व सिल्लोड या तालुक्यांना प्रत्येकी एक सभापतीपद मिळाले आहे. मात्र पैठण, खुलताबाद आणि सोयगाव या तालुक्यांची पाटी खोरी राहिली.
राजकारणात कायमस्वरूपी अबोला किंवा वैर नसते. परिस्थितीनुसार भूमिका बदलत असतात. आमचे संख्याबळ अधिक असताना आम्ही अडीच-अडीच वर्षांचे सत्तासमीकरण देण्याची तयारी दाखवली होती; मात्र शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा हट्ट धरला. एकत्र येण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी तो हट्ट सोडला असता तर आज तेही सत्तेत सहभागी झाले असते. -मंत्री अतुल सावे.