Crime News Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar crime : बीड बायपासवर लुटारू तृतीयपंथीच्या टोळीकडूनच वकिलाची हत्या

पैशाच्या वादातून झटापटीत मांडीत खुपसला चाकू

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : हायकोर्टाचे वकील मिथुन भास्कर यांच्या खुनाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा आणि एमआयडीसी मिथुन भास्कर सिडको पोलिसांना अखेर यश आले. तृतीयपंथीला भेटण्यासाठी बीड बायपासवरील गांधेली शिवारात गेलेल्या भास्कर यांचा अवघ्या २०० रुपयांवरून वाद झाला. त्यावरून तृतीयपंथीने त्यांच्या मांडीत (जांघेत) चाकू खुपसला. त्यानंतर दोन साथीदारांना बोलावून घेत पुन्हा भास्कर यांना तिघांनी लुटण्याचा प्रयत्न केला. जांघेतील मुख्य रक्तवाहिनी तुटल्याने मोठा रक्तस्राव होऊन भास्कर यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली.

मुख्य आरोपी सादिक बशीर अन्सारी (४०, रा. शहानूरमिया दर्गा तृतीयपंथी), त्याचे साथीदार नानकसिंग हिरासिंग जुनी (२०, मुकुंदनगर) आणि मुकुंदवाडी भागातील एक अल्पवयीन अशी आर-ोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी गुरुवारी (दि.१६) दिली.

फिर्यादी सीआयडीच्या पोलिस अधिकारी मधुरा भास्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे बंधू मृत अॅड. मिथुन पुंडलिक भास्कर (४९, रा. आनंदनगर, बीड बायपास) हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकील म्हणून कार्यरत होते. बुधवारी (दि.१५) भास्कर हे नेहमीप्रमाणे हायकोर्टातील काम संपवून घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आईने मधुरा यांना कॉल करून चिंता व्यक्त केली. संध्याकाळी ७ वाजता त्यांनी पत्नीला १० मिनिटांत घरी येतो, असे सांगितले होते, मात्र ते परतले नाहीत.

रात्री ८ वाजेपासून त्यांचा फोन लागत नव्हता किंवा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे चिंताग्रस्त भास्कर यांचा मुलगा, मुलगी पत्नी यांनी मधुरा यांना पुन्हा कॉल करून बोलावून घेतले. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी मधुरा आणि मृताची मुलगी हे मृताचा शोध घेण्यासाठी मोपेडवर बीड बायपास रस्त्याने गांधेली शिवराकडे गेले. तिथे हॉटेल ब्लॅक हॉर्सजवळ गर्दी दिसली व मर्डर झाल्याची चर्चा ऐकली.

रात्री १०.४७ वाजता मृताचा मित्र राहुल R नरवडे याने फिर्यादीला फोन करून एकट्याच गर्दीकडे या, असे सांगितले. त्यामुळे भाचीला घरी सोडून परत गर्दीकडे गेल्या. तेव्हा मृत मिथुन हे सर्व्हिस रोडवर रक्ताच्या थारोळ्यात, बेशुद्धावस्थेत पडलेले होते. त्यांचे कपडे रक्ताने माखले होते. रस्त्यालगतच्या मोकळ्या शेतात अंदाजे ३० मीटर आतमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्त सांडलेले होते.

आजूबाजूला आक्षेपार्ह रिकामी पाकिटे, मृताचा चष्मा आणि पेन पडलेला होता. भास्कर यांना रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले. तपासणीदरम्यान डॉक्टरांना त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीवरू जांघेजवळ एक मोठी, खोलगट जखमा दिसून आली. मध्यरात्री १२:१० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बाहेरचा व्यक्ती हेरून लूटमार तृतीयपंथी सादिक रस्त्याच्या कडेला उभा राहतो. बाहेरचे ट्रॅक ड्राइव्हर, परिसरातील लोक, खरेदीसाठी येणारे लोक हेरतात. स्थानिक नसेल तर आत झाडाझुडपात नेऊन वाद घालून लुटतात भास्कर हे आडनाव बाहेरचे वाटल्याने सादिकने हरले होते. लुटण्याच्या उद्देशानेच त्यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले.

मोबाईल, पाकीट गायब

भास्कर यांचा मोबाईल आणि पाकीट गायब असल्याचे समोर आले आहे. मोबाईल आरोर्पीनी कुठे फेकला, पाकीट कुठे गेले याबाबत चौकशी करत आहेत.

टाळी वाजवून साथीदारांना इशारा

सादिक आणि भास्कर यांच्यात झटापट सुरू झाली, चाकू लागूनही भास्कर यांनी सादिकला प्रतिकार केल्याने त्याने टाळी वाजवून धोक्याचा नियोजित इशारा केला. त्यामुळे झाडीतच काही अंतरावर दबा धरून बसलेले आरोपी नानकसिंग आणि अल्पवयीन साथीदार यांनी धाव घेतली. तिघांना भास्कर यांनी प्रतिकार केला. मात्र चाकू जांघेत लागल्याने अखेर त्यांनी जागीच प्राण सोडले.

५००-३०० रुपयांचा वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, तृतीयपंथी आरोपी सादिक याने भास्कर यांना ५०० रुपयांची मागणी केली. मात्र भास्कर यांनी मी ३०० रुपयेच देणार, असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातच सादिकने चाकू काढून थेट भास्कर यांच्या मांडीत खुपसला, जांघेतील रक्तवाहिनी फाटल्याने भास्कर यांचा मृत्यू झाला.

रस्त्यावर किंवा चौकात जबरदस्तीने पैसे मागितल्यास खैर नाही

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुरुवारी (दि.१६) कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. रस्ते, चौक किंवा ट्रॅफिक जंक्शनवर गट करून वाहनचालक आणि नागरिकांकडून बळजबरीने पैसे मागणा-यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. हे आदेश १५ एप्रिल ते १३ जूनपर्यंत लागू राहतील. लग्नकार्य, धार्मिक विधी किंवा कुटुंबातील दुःखद प्रसंगी निमंत्रणाशिवाय प्रवेश करणे, नागरिकांना धमकावून पैशाची मागणी करणे यावर सक्त मनाई करण्यात आली आहे. तृतीयपंथी किंवा इतर गटांकडून होणारा उपद्रव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर बडगा उगारला जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

रस्त्याच्या कडेला मृतदेह सोडून पसार

भास्कर यांना रस्त्यापासून ३० मीटर आत झाडाझुडपात जखमी अवस्थेत बराच वेळ आरोपींनी रोखून धरल्याने रक्तस्त्राव खूप झाला. त्यानंतर आरोपींनीच त्यांना रस्त्याच्या कडेला त्यांच्या मोपेडजवळ आणून टाकले. त्यानंतर तिघेही तेथून पसार झाले.

सादिकने गाठले गुरुचे घर

तृतीयपंथी सादिकने एकाला चाकू मारल्याची माहिती साथीदारांनी शिवाजीनगर भागातील गुरुला कॉल करून दिली. त्यानंतर सादिक तेथून थेट गुरुच्या घरी गेला. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव, एपीआय भरत पाचोळे, उपनिरीक्षक अर्जुन कदम, हवालदार राजेंद्र साळुंके यांच्या पथकाने तिन्ही आरोपीना काही तासात बेड्या ठोकल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT