उपोषण आंदोलन करताना आदर्शचे ठेवीदार व माजी खासदार इम्तियाज जलील. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : दोन वर्षांत आदर्शच्या ६९ ठेवीदारांचा मृत्यू; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

तातडीने पैसे परत करा, नाहीतर येत्या १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी आत्मदहन करू, असा इशारा सोमवारी (दि. ३) उपोषणकर्त्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांना दिला.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेची परत मिळविण्यासाठी अडीच वर्षांपासून संघर्ष करीत आहोत. पंरतु अजूनही ३१ हजार जणांच्या १५० कोटी रुपयांच्या ठेवी शिल्लक आहेत. या लढ्यात आतापर्यंत ६९ ठेवीदार वृद्धांचा मृत्यू झाला असून, आणखी किती जणांचा जीव घेणार आहात. तातडीने पैसे परत करा, नाहीतर येत्या १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी आत्मदहन करू, असा इशारा सोमवारी (दि. ३) उपोषणकर्त्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांना दिला.

यावेळी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मागील अडीच वर्षांपासून आदर्श पतसंस्थेचे ठेवीदार प्रशासनाकडे हक्काच्या ठेवी परत मिळविण्यासाठी लढा देत आहेत. यात आतपर्यंत ६ हजार ठेवीदारांना ५० कोटी रुपये परत मिळाले आहेत, परंतु अजूनही तब्बल ३१ हजार २०० ठेवीदारांचे दीडशे कोटी रुपये शिल्लक आहेत.

ठेवी परत मिळाव्यात यासाठी सोमवारी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात जलील हेही उपस्थित होते. त्यांच्यासमोर एका वृद्धाला हद‌यविकाराचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तर दुसऱ्या एका महिला आंदोलकाना उपोषणामुळे भुरळ आली. या प्रकारानंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी गौडा यांना माहिती दिली. तसेच वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचेही सांगितले.

दरम्यान, सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चेला बोलावून घेतले. त्यावेळी ठेवी केव्हा परत मिळेल, असा सवाल जलील यांनी उपस्थित केला. तसेच जागा विक्री करण्याबाबतचा प्रस्ताव मागील दीड वर्षापासून सहकार आणि पोलिस विभागात धूळखात पडून आहे. अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करण्यास वर्ष लागते. तेव्हा ठेवीदारांनी हक्काच्या पैशासाठी खेट्या मारतच मरावे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसेच आता जो काही पैसा उपलब्ध होईल, तो प्रत्येक ठेवीदारांना समान वाटप करावा, अशी मागणीही जलील यांनी केली. तर काहींनी येत्या १७ सप्टेंबरपर्यंत ठेवी परत न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांपुढे आत्मदहण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे, यावेळी विविध तालुक्यांतून मोठ्याप्रमाणात ठेवीदार आणि एमआयएमचे पदाधिकारी, नगरसेवक आंदोलनात सहभागी होते.

माजी सैनिकांचेही पैसे अडकले

देशाच्या सीमेवर २८ वर्षे रक्षणाची सेवा बजावली, युद्ध लढले. या सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालो. मात्र आता पतसंस्थेत ठेवलेल्या हक्काच्या पैशासाठी लढा द्यावा लागत आहे, अशी खंत एका माजी सैनिकाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यापुढे व्यक्त केली.

शहरभर मृतांचे होर्डिंग लावू

ठेवी परत मिळविण्याच्या आंदोलनात आतापर्यंत आदर्शचे ६९ ठेवीदार मरण पावले आहेत. वेत्या मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी त्या सर्वांचे शहरभर होर्डिंग लावून यांना कधी न्याय मिळणार, अशी मागणी करावी का, असा सवाल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT