Adarsh depositors' march to the District Collector's office
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आदर्श पतसंस्थेत अडकलेल्या लाखोच्या ठेवी परत मिळाव्यात, यासाठी बुधवारी (दि.१) माजी खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार थाळी नाद आंदोलन केले. घाम गाळून काबाडकष्टाने कमावलेले पैसे तातडीने परत द्या, अशी मागणी ठेवीदारांनी केली.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी तीन वर्षांपासून अडकून पडल्या आहेत. त्यामुळे असंख्य ठेवीदार, वयोवृद्ध नागरिक त्रस्त आहेत. या ठेवीदारांना पतसंस्थेत अडकलेले कष्टाचे पैसे परत मिळावे म्हणून बुधवारी जलील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे दोन तास थाळी नाद आंदोलन करण्यात आले. जमलेल्या ठेवीदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
अनेक वर्षांपासून पैसे अडकल्याने ओढावलेले आर्थिक संकट आणि अडचणींची व्यथा मांडली. यानंतर जलील यांच्या शिष्टमंडळाने नेतृत्वाखालील जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. हजारो कुटुंबांच्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई परत मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया जलील यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली.