A Massive Fund of ₹21 Crore Allocated for the Development of Ghrishneshwar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने वेरुळ येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखड्यांतर्गत २१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. श्री क्षेत्र घृष्णेश्वर परिसराच्या विकासासाठी १५६ कोटी रुपये खर्चाचा आराखडा आधीच मंजूर करण्यात आलेला आहे. त्यातील काही कामे आता पूर्णत्वाकडे आली आहेत. तर काही प्रगतिपथावर आहेत. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर या विकास आराखड्यातील कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे शंकराचे प्राचीन असे घृष्णेश्वर मंदिर आहे. हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हजारो भाविक भेट देत असतात. त्यामुळे राज्य सरकारने या भागाच्या विकासासाठी २०१८ मध्ये १५६ कोटी रुपयांच्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखड्यास मंजुरी दिली होती. २०२२ पर्यंत या आराखड्यातील कामांसाठी राज्य सरकारने सुमारे २५ कोटी रुपयांचाच निधी उपलब्ध करून दिला होता.
त्यानंतर गतवर्षी पुन्हा ७कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून विविध विकासकामे हाती घेण्यात आली. नाशिक येथील आगामी कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर आता या आराखड्यातील कामे वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांची नियुक्ती केली आहे. आता नियोजन विभागाने शुक्रवार, (दि. २७) रोजी पुन्हा २१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आराखड्यातील कामांना गती मिळणार आहे.
सप्टेंबरअखेरपर्यंत बाह्य वळण रस्ता होणार पूर्ण
श्री क्षेत्र घृष्णेश्वर विकास आर-ाखड्यांतर्गत प्रामुख्याने भक्त निवास, दर्शन बारी, शॉपिंग कॉम्पलेक्स, फंक्शन हॉल, घाट आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील बाह्य वळण रस्त्याचे काम सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. तर उर्वरित कामेही प्रगतिपथवार आहेत.
वाढीव ५३ कोटींची मागणी
एएसआयच्या अखत्यारित येणारा मंदिराचा परिसर आणि समोरील भागातही आता विकास आर-ाखड्यातून नवीन कामे केली जाणार आहेत. त्यासाठी वाढीव ५३ कोटी रुपयांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर आहे. बाह्य वळण रस्त्यासाठी आधी २७ कोटी रुपये इतका खर्च प्रस्तावित होता. तो आता वाढून ४३ कोटी रुपये इतका झाला आहे.