छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जून ते सप्टेंबर या काळात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमधे आठही जिल्ह्यात एकूण ५८३ जनावरे दगावली. यात एकट्या नांदेड जिल्ह्यात २९० जनवारे दगावल्याचे आकडेवारीतून उघड झाले आहे. याशिवाय ४८६ शेतकऱ्यांना शासनाने मदत दिली आहे. यातून २१ अपात्र ठरविण्यात आली आहे. तर ७६ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.
यंदा मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. तर उर्वरीत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली. जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील दुधाळ, ओढकाम करणारी लहान आणि मोठी जनावरे दगावली. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला. अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील यंदा उभा राहिला आहे. यामुळे बळीराजा चिंतेत आहे. चारा आणि पाण्याअभावी देखील जनावरे दगावल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
आठही जिल्ह्यात लहान व मोठी ४४५ दुधाळ जनावरे दगावली आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर २८, जालना ७२, परभणी १०, हिंगोली २६, नांदेड २२६, बीड ३२, लातूर ८ आणि धाराशिव ४३ अशी मृतांची संख्या आहे. तर ओढकाम करणारी १३८ जनावरे दगावली आहेत. त्यामधे छत्रपती संभाजीनगर १३, जालना २०, परभणी ८, हिंगोली १९, नांदेड ६४, बीड १०, लातूर १ तर धाराशिवमधील ३ जनावरे दगावली आहेत.