महाराष्ट्रातील सरकार हे शेतकऱ्यांची काळजी घेणारे आहे. देशात कुठेही सोयाबीन आणि कापसाला अनुदान दिले गेले नाही ते महाराष्ट्रात दिले जात आहे. मी ज्यावेळी परळीला येत होतो, त्यावेळी काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मला विमा बाबत विचारणा केली. त्याचवेळी मी दिल्लीतील कार्यालयात फोन लावून याबाबत निर्णय घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली. परळी येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आमदार पंकजा मुंडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील सरकारचे शेतकरी धोरणाबद्दल कौतुक केले. महाराष्ट्राचे सरकार केंद्राप्रमाणे शेतकऱ्यांना प्रति महिना दोन हजार रुपये देत आहे. याबरोबरच सोयाबीन व कापसाला अनुदान देखील जाहीर केले आहे. काँग्रेसचे लोक केवळ खटाखट पैसे देण्याचे घोषणा करतात. परंतु देत कधीही नाहीत आम्ही मात्र देत आहोत नरेंद्र मोदी हे विशाल दृष्टिकोन असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नक्कीच निर्णय घेऊ कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल यांना चांगला दर मिळावा, यासाठी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे देखील आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले.