Virat Morcha on August 21 in Beed over Vilas Ghule murder case
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील बहुचर्चित विलास घुले हत्या प्रकरणात खासदार पुत्रासह इतर आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासन याची दखल घेत नसल्याने आता २१ ऑगस्ट रोजी बीडमध्ये विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार पुत्राचे नाव आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या प्रकरणावरून बीडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याच्यासह अन्य दोघांना आरोपी करून अटक करावी, अशी मागणी मृत विलासचे भाऊ रमेश घुले यांनी पुरवणी जबाबात केली आहे. याच मागणीसाठी रमेश घुले यांचे १२ दिवसांपासून उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती खालावली आहे. तरीही त्यांनी रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास आता 'सीआयडी'कडे (CID) सोपवला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर असताना विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी विषप्राशन केले होते; त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने १५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत २१ तारखेच्या विराट मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
राजकीय द्वेषातून मुलावर आरोप; खासदार बजरंग सोनवणे आक्रमक
या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. "माझ्या मुलावर केवळ राजकीय द्वेषातून आरोप केले जात आहेत. याच कारणामुळे जबाबात त्याचे नाव आले आहे. आरोपी म्हणून नाव आणण्यासाठी सध्या ब्लॅकमेलिंग सुरू आहे. मात्र, मी आता जागरूक झालो असून विनाकारण माझ्या मुलाला गोवण्याचा प्रयत्न केल्यास ते सोपे होणार नाही," असा स्पष्ट इशारा खासदार सोनवणे यांनी दिला आहे.