परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून उन्हाच्या तीव्रतेने जीवाची लाही लाही होत आहे. वाढलेले तापमान लक्षात घेता उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जागृती करण्यात येत आहे. मात्र हातावर पोट असणाऱ्या लोकांना उन्हात काम करण्याशिवाय गत्यंतरच नाही. यातूनच परळीच्या आठवडी बाजारातील एका भाजीविक्रेत्यावर काळाने घाला घातला असून उष्माघाताने त्याचा बळी गेला आहे. महादेव संभाजी गुट्टे (वय ५४) असे या भाजीविक्रेत्याचे नाव आहे.
परळी तालुक्यातील दैठणा घाट येथील महादेव गुट्टे हे आपल्या शेतात भाजीपाला उत्पादित करून आठवडी बाजारात भाजीपाल्याची विक्री विकतात. आठवडी बाजारात नेहमीप्रमाणे दुपारी भाजीपाल्याची विक्री करत असताना उष्माघाताने भोवळ आली. व ते जागेवरच कोसळले. भाजीपाला विक्रेत्यांनी त्यांना तातडीने परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. परळी तालुक्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला आहे. दरम्यान, महादेव गुट्टे यांच्या संपूर्ण कुटुंबाची उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे.
हेही वाचा :