परळी : शेतीचा पिकाविमा, अनुदान, कर्जमाफी व केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीने सोमवारी (दि. २३) परळीत आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बैलगाडी व ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते. कृषिमंत्र्याच्या मतदार संघातच शेतकऱ्यांनी आक्रोश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शेतकरी संघर्ष समितीचा घटक असलेल्या अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अजय बुरोटे यांनी मोर्चा दरम्यान अभ्यासपूर्ण मांडणी करत शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्या, भाव नसल्यामुळे दोन वर्षापासून सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात कुजत आहे. सरकार खरेच हमीभावाने सर्व सोयाबीन खरेदी करणार काय? इतर आश्वासनाप्रमाणे ही पण केवळ पोकळ सोषणाच ठरणार का? असा सवाल सरकारला केला.
केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शेतकरी हिताच्या घोषणा नकोय तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करा अशी मागणी शेतकरी नेते आपेट यांनी केली शेतकऱ्यांना तातडीने मदत करा अशी मागणी अच्युत गंगणे यांनी केली. दरम्यान शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य नाही झाल्या तर वेगळ्या स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जेष्ठ नेत्या सुदामती गुट्टे यांनी दिला. अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना कृषिमंत्र्याचे आश्वासन म्हणजे लबाडाचे अवतन असल्याचा आरोपही त्यांनी केला.
परळी येथील या मोर्चात मोठ्या संख्येने बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि हातात लाल होडे घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसर येथून मोर्चाला सुरुवात झाली. संत सेवालाल महाराज चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर, कृषी उत्पन्न बाजार समिती, एक मिनार चौक, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मौलाना अबुल कलाम आझाद चौक मार्गे सिंचन भवन समोरून उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला. मोचांत विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर वाघमोडे यांनी रोखठोक भाषण केले. ते म्हणाले, विरोधी पक्षात असताना धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातील जनता आणि शेतकर्यांनी देखील प्रचंड प्रेम केले. विरोधी पक्षनेता असताना शेतकर्यांबद्दल पोटतिडकीने बोलणारा व्यक्ती आज सुदैवाने राज्याचा कृषीमंत्री आहे. कृषीमंत्र्यांनी बळीराजाला न्याय देऊन त्यांच्या प्रेमातून उतराई होण्याची संधी गमावू नये असे सांगितले.