परळी वैजनाथ : परळीतील तौहीद खान हत्या प्रकरणाचे पडसाद बुधवारी (दि.१) विधिमंडळात उमटले. माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हे प्रकरण उपस्थित करत, कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली.
मुंडे यांनी तौहीद खान हा कुटुंबाचा कर्ता सदस्य असल्याचे नमूद करत, त्याच्या निधनानंतर कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे राज्य सरकारने संबंधित कुटुंबाला विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
या घटनेमागे अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याचाही संबंध असल्याचे सांगत, बीड जिल्ह्यात विशेषतः तरुणांमध्ये वाढत चाललेल्या नशेच्या व्यसनाबाबत कठोर कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. यासाठी विधिमंडळात स्वतंत्र चर्चा घडवून आणून प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.यापूर्वीही मुंडे यांनी तौहीद खान प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला असून, कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते. तसेच तातडीची आर्थिक मदत देण्याबरोबरच तौहीद यांच्या तीन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
विधिमंडळात बीड जिल्ह्यातीलच दोन आमदारांत कलगीतुरा...
दरम्यान, मुंडे यांनी औचित्याचा मुद्दा मांडला असताना त्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या बोलण्यास हरकत घेतल्याचे दिसून आले. कामकाजाच्या क्रमवारीत नसतांना धनंजय मुंडेंना परवानगी कशी दिली? असा आक्षेप प्रकाश सोळंके यांनी घेतला. मात्र, अध्यक्षांच्या परवानगीनेच मुंडे यांना बोलण्याची संधी देण्यात आल्याचे तालिका सभापतींनी स्पष्ट करत सोळंके यांची हरकत फेटाळून लावली. परंतु या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील दोन आमदारातील स्थानिक राजकीय वैमनस्य सभागृहातही दिसून आले. या प्रकाराच्या राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.