पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिनजोड पैलवाल आहेत, असं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केले. मला कुणाकडून अपेक्षा नाही, देवेंद्र बाहुबली मदत करू शकतात, असा विश्वास व्यक्त करत संतोष देशमुख खून प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कणखर भूमिका घेतल्याचे धस यांनी सांगितले. बुधवारी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
आष्टीमध्ये २ हजार ८०० कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी आमदार धस म्हणाले की, बीड जिल्ह्याची बदनामी होतेय, असं काही लोक म्हणातात. पण काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली होती. संतोष देशमुख खून प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घेतली. कुणालाच सोडणार नाही असं सांगितलं. अजूनही राख, वाळू आणि भूमाफियांना मोका लावला पाहिजे, असे आमदार धस म्हणाले.
२०१९ मध्ये पूर्ण बहुमत येऊनही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत. जनादेश आपल्या बाजूने होता, पण तो पहाटेचा चोरून नेला. फडणवीस यांना राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस करण्याची कटकारस्थाने रचली गेली. पण त्यांनी संघर्ष केला आणि त्यावर मात केली. देवेंद्र फडणवीस बिनजोड पैलवाल आहेत, असेही धस म्हणाले.