बीड : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना बीड जिल्ह्याविषयी विशेष ओढ होती. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीसारखा सर्वांगीण विकास या जिल्ह्यात घडविण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्या स्वप्नपूर्तीसाठी प्रशासनाने एकदिलाने व प्रामाणिकपणे काम करावे, असे भावनिक आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केले. सभा अत्यंत भावुक वातावरणात पार पडली.
सभेच्या प्रारंभी स्व. अजित पवार यांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शोकप्रस्ताव मांडला. उपस्थित लोकप्रतिनिधींनी भावना व्यक्त केल्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा यांची मुंबईतून उपस्थिती होती. खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आदी मान्यवर सहभागी झाले. समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सादरीकरण केले.
पालक सचिव विजय वाघमारे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख यांची उपस्थिती होती. बीड येथील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. सुधाकर चिंचाणे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.
575 कोटींच्या नियतव्ययाचा आढावा
सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण गटासाठी 575 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर असून, त्यापैकी 565 कोटी 41 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत 199 कोटी 64 लाख रुपये खर्च झाले असून खर्चाचे प्रमाण 34.72 टक्के इतके आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी दिली.
अनुसूचित जाती योजनेंतर्गत 129 कोटींचा नियतव्यय असून 81 कोटी 57 लाख रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली (52.20 टक्के). जिल्हा वार्षिक योजना ओटीएसपी अंतर्गत 2 कोटी 39 लाख निधी प्राप्त झाला असून 2 कोटी 19 लाख रुपयांच्या कामांना मान्यता; त्यापैकी 61 लाख रुपये खर्च (25.69 टक्के) झाला आहे.
2026-27 चा प्रारूप आराखडा सादर
सन 2026-27 साठी नियोजन विभागाकडून 481 कोटी 62 लाख रुपयांचा कमाल आर्थिक नियतव्यय निर्धारित करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्याचा प्रारूप आराखडा सभेत सादर करण्यात आला. दुपारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतही हा आराखडा मांडण्यात आला असून अतिरिक्त निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीने केली आहे.
विकासगंगा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवू - सुनेत्रा पवार
अजितदादांनी बीडच्या विकासासाठी जो निर्धार केला होता, तो पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. विकासगंगा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने गतिमान व परिणामकारक कामगिरी करावी.सभेत विविध विभागांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. निधी खर्चाची गती वाढविणे, मंजूर कामे वेळेत पूर्ण करणे आणि गुणवत्तेला प्राधान्य देणे याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. एकूणच, स्व. अजितदादांच्या आठवणींनी भारलेल्या या बैठकीत विकासाचा ठोस रोडमॅप मांडत प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.