कडा :सोशल मीडियावर टाकलेल्या स्टेटस आणि स्टोरीच्या किरकोळ कारणावरून पेटलेला वाद थेट रक्तरंजित हाणामारीत बदलल्याची धक्कादायक घटना रुईनालकोल (ता.आष्टी, जि.बीड) येथे सोमवारी (दि.16) रात्री घडली. या घटनेत दीपक शिवाजी नालकोल (20) या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. घटनेमुळे गावासह परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर सोमवारी रात्री तरुणांचे दोन गट आमनेसामने आले. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर एकमेकांविरोधात टाकलेल्या स्टोरीवरून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांत कुरापती सुरू होत्या. सोशल मीडियावरून सुरू झालेली चिथावणी अखेर प्रत्यक्षात भिडली आणि त्याचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले.
वादाच्या भरात एका गटातील तरुणांनी धारदार शस्त्राने दुसऱ्या गटातील तिघांवर सपासप वार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत गंभीर जखमा झाल्या होत्या.
हल्ल्यात दीपक शिवाजी नालकोल गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेले दोन तरुण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच आष्टीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय नरवाडे, विक्रांत हिंगे, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा नरवाडे व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
कायदा-सुव्यवस्थेवर नागरिकांचा सवाल
या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. किरकोळ कारणावरून तरुणाचा खून होतो, हे अत्यंत धक्कादायक आहे. अशा घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कडक कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली. गावपातळीवर वाढते वैमनस्य, सोशल मीडियावरील उघड चिथावणी आणि शस्त्रांचा सहज वापर यामुळे ग्रामीण भागातही असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे चित्र आहे.
सोशल मीडियावरील क्षुल्लक वादातून घडलेली ही रक्तरंजित घटना केवळ एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळणारी नाही, तर समाजासमोर गंभीर प्रश्न उभे करणारी आहे. आभासी संघर्ष प्रत्यक्ष हिंसाचारात बदलू नयेत यासाठी समाज, प्रशासन आणि कुटुंबीयांनी सजग होण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तरुणांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शनाची गरज अधोरेखित केली जात आहे.
सोशल मीडियाचा वाढता हैदोस
किरकोळ स्टोरी किंवा स्टेटसवरून सुरू होणारे वाद थेट जीवघेण्या हाणामारीपर्यंत पोहोचत असल्याच्या घटना अलीकडे वाढताना दिसत आहेत. आभासी जगातील टोमणे, चिथावणी आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली होणारी स्पर्धा तरुणांच्या मनात राग, सूडभावना आणि हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.