केज : संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींचे एन्काऊंटर करायला हवे, म्हणजे अशा प्रकारची कोणी आगळीक करणार नाही. राज्यात गुन्हेगारावर जरब बसवायला हवी, असे प्रतिपादन आमदार सदाभाऊ खोत यांनी आज (दि.३) केले. मस्साजोग येथे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी खोत म्हणाले की, गुन्हेगारांना न्यायालयातून फाशीची शिक्षा होईपर्यंत वाट पाहण्यात थांबण्या पेक्षा अशा या फाळकुट दादांना भर चौकात गोळ्या घालून त्याची एन्काऊंटर करायला हवे. म्हणजे राज्यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हेगार डोके वर काढणार नाही. तसेच गुन्हेगारांना कोणीही राजाश्रय देऊ नये. या हत्या प्रकरणातील गुन्हेगार राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय असल्याने यावर त्यांनी स्पष्ट बोलणे टाळले. तरीही राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखायला हवे. असे मत त्यांनी व्यक्त केले. या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम नेतृत्व असून ते देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत.
सामान्य गुन्ह्यामध्ये पोलीस ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करतात. मात्र, एवढ्या गंभीर गुन्ह्यात गुन्हेगारांच्या नातेवाईकांची देखील चौकशी व्हायला हवी, अशी मागणी ग्रामस्थांनी सदाभाऊ खोत यांच्याकडे केली.