धारूर ः घराशेजारी असलेल्या गोठ्याला आग लागल्यानंतर आत अडकलेल्या आठ गायींना सोडवण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना धारूर तालुक्यातील रेपेवाडी येथे मंगळवारी रात्री घडली. या आगीमध्ये आठ गायी, पंधरा शेळ्या व दीडशे कोंबड्या ठार झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशामक दलासह पोलिस अधिकाऱ्यांनी रेपेवाडीत धाव घेतली.
रामभाऊ एकनाथ रेपे (वय 80) हे आपल्या पत्नीसह शेतातील गेोठ्यामध्ये वास्तव्यास होते. कमी उंचीच्या दगडी भिंती, गवताचे छप्पर आणि एकाच दरवाज्याची रचना असलेल्या या गोठ्याला चुलीमुळे अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याचे लक्षात येताच रामभाऊ रेपे हे गोठ्यातील जनावरे सोडवण्यासाठी आत गेले. मात्र, आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केल्याने गोठ्याचे लाकडी छत कोसळले. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही आणि आगीत अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेत एकूण 8 जनावरे, 15 शेळ्या आणि सुमारे 150 कोंबड्या होरपळून मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच कोठ्यातील चारा व इतर साहित्यही आगीत भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बालाजी शिनगारे, संजय गायसमुद्रे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. तसेच घटनेस्थळी तात्काळ धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे सह पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी भेट दिली.
यावेळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, धारूर तहसीलचे तहसीलदार श्रीकांत निळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली असून संबंधित कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे रेपेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.