Godavari River Accident pudhari photo
बीड

Godavari River Accident : दोन मृत्यू, अनेक प्रश्न अनुत्तरित; आपत्ती व्यवस्थापन कागदावरच

पुरुषोत्तम पुरी दुर्घटनेनंतर प्रशासन बचावाच्या भूमिकेत

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव : पुरुषोत्तमपुरी येथील अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत बोट उलटून दोन महिलांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मात्र या दुर्घटनेपेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे दुर्घटनेनंतर सुरू झालेली जबाबदारी झटकण्याची स्पर्धा. दोन निष्पाप भाविकांचा जीव गेल्यानंतर दोष निश्चित करण्याऐवजी प्रशासनातील काही अधिकारी स्वतःची जबाबदारी नाकारण्यात व्यस्त असल्याचे चित्र समोर येत आहे.

यामध्ये सर्वाधिक चर्चेत आलेले वक्तव्य म्हणजे माजलगावचे तहसीलदार संतोष रुईकर यांचे. दुर्घटनेबाबत विचारणा केली असता संबंधित घटना माजलगाव महसूल हद्दीत येत नसल्याचे सांगून त्यांनी आपली जबाबदारी नसल्याचा सूर लावल्याची चर्चा यात्रास्थळापासून जिल्हा मुख्यालय पर्यंत सुरू आहे. मात्र राज्यभरात प्रसिद्ध असलेले पुरुषोत्तमपुरी हे तीर्थक्षेत्र माजलगाव तालुक्यात असल्याचे सर्वश्रुत असताना अशा प्रकारची भूमिका घेण्यामागचे कारण काय? दुर्घटना नेमकी कोणत्या महसूल सीमेत घडली यापेक्षा तीर्थक्षेत्रावरील सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती, हा खरा प्रश्न आहे.

पुरुषोत्तम पुरी येथे अधिकमास निमित्त सुरु असलेल्या यात्रेसाठी राज्याच्या कान्कोपार्यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. परंतू प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. वाढणारी गर्दी, नदी पात्रात होत असलेल्या नोकयान याबाबत दैनिक पुढारीने वृत्त प्रकशित करून भाविकांच्या सुरक्षेचा विषय मांडला होता. मात्र प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि हि दुर्घटना घडली.

पोलिस, महसूल, देवस्थान आणि स्थानिक प्रशासन नेमके करत काय होते?

यात्रास्थळी हजारो नव्हे तर लाखो भाविक दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाला आधीपासून होती. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस बंदोबस्तही होता. महसूल विभागाचे अधिकारी तैनात होते. देवस्थान समितीची यंत्रणाही कार्यरत होती. तरीही बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कसे बसविले गेले? लाईफ जॅकेटशिवाय नदीत वाहतूक कशी सुरू होती? प्रवाशांची नोंदणी, नियंत्रण आणि देखरेख का नव्हती? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याऐवजी जर अधिकारी आपली जबाबदारीच नाकारत असतील तर चौकशीचा उद्देश काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे दोन महिलांचा मृत्यू झाल्यानंतरही काही काळ नदीपात्रातील बोट वाहतूक सुरूच असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित

आता चौकशी नव्हे, उत्तरदायित्वाची गरज असताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवालही येईल. परंतु नागरिकांचा प्रश्न वेगळा आहे. 'पुढारी'चा इशारा दुर्लक्षित का झाला? बोट वाहतुकीवर नियंत्रण कोणी ठेवायचे होते? सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी झाली का? दोन मृत्यूसाठी जबाबदार कोण? दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळेपर्यंत पुरुषोत्तमपुरी दुर्घटनेवरील संताप शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

दुर्घटनेतील जखमींची नावे

१. सिंधुबाई वाघ (६७, किन्ही, ता. लोणार)

२. कमलाबाई फड (७०, कुंबेफळ, सिदखेड राजा)

३. प्रतिभा फड (६५, कुंभेफळ, सिंदखेड राजा)

४. कमलबाई कांगणे (६६, कुंबेफळ, सिंदखेड राजा)

५. शिवगंगा कांगणे (७०, कुंबेफळ सिंदखेड राजा)

६. पार्वती सोनवणे (६०, कुंभेफळ, सिंदखेड राजा)

७. बेबी कांगणे (६२, कुंबेफळ, सिंदखेड राजा)

८. शिवगंगा फड (६६, कुंभेफळ, सिंदखेड राजा)

९. गोदावरी फड (६०, कुंबेफळ, सिंदखेड राजा)

१०. सुनिता फड (४५, कुंभेफळ, सिंदखेड राजा)

११. संगीता मुंडे (४०, बोरी तालुका मेहकर

तहसीलदार यांचा जावई शोध की जबाबदारीपासून पळवाट ?

दुर्घटनेनंतर सर्वांचे लक्ष बचावकार्य, जखमींवर उपचार आणि भविष्यातील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे असणे अपेक्षित असताना काही अधिकारी अधिकारक्षेत्राच्या सीमारेषा मोजण्यात व्यस्त असल्याची टीका होत आहे. माजलगावचे तहसीलदार संतोष रुईकर हे ही घटना माजलगावच्या हद्दीत झालीच नाही ती परतूर तहसीलच्या हद्दीत घडली असल्याचे त्यांनी दैनिक पुढारी शी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT