संतोष देशमुख हत्‍या प्रकरण. (File Photo)
बीड

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी कारवाई! सर्व ८ आरोपींना मोक्का

Santosh Deshmukh murder case | मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली होती घोषणा

पुढारी वृत्तसेवा

बीड; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder case) यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी अद्यापही फरार असताना आता या सर्वच ८ आरोपींना मोक्का (MCOCA) लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विधीमंडळ सभागृहात याबाबतची घोषणा केली होती. त्याची आज अंमलबजावणी करण्यात आली.

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, प्रतीक घुले व सिद्धार्थ सोनवणे हे सध्या अटकेत आहेत. तर कृष्ण आंधळे हा अद्यापही फरार आहे. त्याचा शोध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची तिन्ही पथक घेत आहेत. तर दुसरीकडे अटकेत असलेले आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याने त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या दरम्यान आज विष्णू चाटे याला न्यायालयात हजर करण्यात आले असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याची पोलिस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात या हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आज करण्यात आली. आता या सर्व आरोपींवर मोक्का लावला असल्याची माहिती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

विष्णू चाटे न्यायालयीन कोठडी

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विष्णू चाटे याला काल १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा केज तालुक्याचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे हा केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन चक्की प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणी १९ डिसेंबरपासून सीआयडीच्या कोठडीत होता. विष्णू चाटे याला शुक्रवारी (दि. १० जानेवारी) केज येथील दिवाणी न्यायाधीश क स्तर तथा न्यायदंडाधिकारी एस. व्ही. पावसकर यांच्या न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायदंडाधिकारी एस. व्ही. पावसकर यांना त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पात सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने खंडणीसाठी तेथील सुरक्षा रक्षक व अधिकारी यांच्यासोबत झालेल्या भांडणातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा पाठलाग करून गाडी अडविली. त्यानंतर गाडीची काच फोडून त्यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण केले आणि त्यानंतर त्यांची हत्या केली होती. हे खंडणी आणि हत्या प्रकरण हे एकमेकांशी निगडित आहे.

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप होत असलेला आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT