Picture of Rena Dam; Groundwater increased, relief for Kharif season
विठ्ठल कटके
रेणापूर : रेणापूर तालुक्याचे वार्षिक सरा-सरी पर्जन्यमान ८१५.४० मि.मि. एवढे असुन मे महिन्यात १७५ मिमी तर १ ते १५ जुन पर्यंत ११५ मिमी असा एकुण २९० मिमी पाऊस झाला आहे. वाषींक सरासरी गाठण्यासाठी आणखी ५२५ मिमी पावसाची आवश्यकता आहे. एवढा पाऊस होऊनही रेणा धरणातील पाण्याची पातळी मात्र जैसे थे (२५ टक्के) अशीच आहे..
अवकाळी पावसाने रेणा नदीवरील बॅरेजेस तुडुंब भरून वाहिले. आजही बॅरेजेस मध्ये ३० ते ४० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. आजपर्यंतच्या पावसाने तालुक्याच्या पाणी पातळीत वाढ होऊन विहिरी व बोअरचे पाणीही वाढत आहे. पावसाळ्यापुर्वीच पाणीसाठ्यात वाढ होत असल्यामुळे पडलेला पाऊस खरीप हंगामासाठी उपयुक्त ठरणारा आहे.
रेणापूर तालुक्यात खरीपाच्या पेरणीपूर्वीच मे महिन्यात अवकाळी पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. त्यानंतर पाऊस उघडेल व मृगात खरीपाच्या पेरण्या होतील अशी आशा शेतकरी बाळगुन होते. परंतु १ जून ते १५ जुन या कालावधीत रेणापूर तालुक्यातील पाच महसुल मंडळात एकूण ११५ मिमी पाऊस झाला आहे.
असाच आणखी कांही दिवस पाऊस पडत गेला तर मात्र शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. अशी भितीही व्यक्त केली जात आहे. रेणापूर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे रेणा नदीवरील घनसरगाव वगळता रेणापूर, जवळगा व खरोळा हे बॅरेजेस तुडुंब भरून वाहिले. रेणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा द्यावा लागला. असे असले तरी, रेणा मध्यम प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात पाऊस पडला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी आहे तशीच आहे. एप्रील महिन्यात धरणात जलसाठा २५ टक्के होता आजही तेवढाच आहे.
सततच्या पावसाने शेततळ्यात पाणी साचत आहे. भुगर्भातील पाण्या-ची पातळी वाढुन विहिरी व बोअरच्या पाणीपातळीही वाढ होत आहे. सध्या पडणारा पाऊस खरीप पिकांसाठी उपयुक्त तर आहेच शिवाय तो यंदाच्या रब्बी हंगामासाठीही उपयुक्त ठरणारा आहे. नदी-नाले वाहत आहेत. त्यामुळेयावर्षी सिंचन क्षेत्रात वाढ होऊन ऊसाचे क्षेत्रही वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.