परळी : "पावसाळा आला की शिक्षणावर पडते पाणी; पुलाअभावी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास" या शीर्षकाखाली 'पुढारी'ने गाढेपिंपळगाव येथील आरसुळे वस्तीवरील विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ठळकपणे मांडताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या प्रश्नाला अखेर गती मिळाली असून, जिल्हा परिषद बांधकाम विभागाने घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून नवीन पुलाच्या उभारणीसाठी आवश्यक मोजमाप पूर्ण केले आहे.
'पुढारी'च्या वृत्तामुळे हा प्रश्न जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दारात पोहोचला. मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनीही या प्रश्नाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्यानंतर प्रशासनाने विलंब न लावता कार्यवाही सुरू केली. शनिवारी जिल्हा परिषद, बीडच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आणि त्यांच्या पथकाने आरसुळे वस्तीला भेट देत नदीवरील प्रस्तावित पुलाची जागा पाहिली.
पुलाच्या तांत्रिक प्रस्तावासाठी आवश्यक मोजमाप घेण्यात आले असून, लवकरच प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरसुळे वस्तीवरील विद्यार्थी, महिला आणि ग्रामस्थांना दरवर्षी पावसाळ्यात ओढा-नदीच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता.
विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवावर उदार होऊन नदी पार करावी लागत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. मात्र, 'पुढारी'ने या गंभीर प्रश्नाला वाचा फोडत वस्तुस्थिती प्रशासनापुढे आणल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करत पुलाच्या उभारणीच्या प्रक्रियेला सुरुवात केली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी 'पुढारी'चे आभार मानत, "वृत्तपत्राने आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचविला. त्यामुळे अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे," अशी भावना व्यक्त केली. तसेच पुलाला तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष बांधकाम सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
"आरसुळे वस्तीच्या पुलाचा प्रश्न आम्ही अनेक वर्षांपासून सातत्याने मांडत होतो. मात्र, त्याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नव्हते. 'पुढारी'ने विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाची वस्तुस्थिती ठळकपणे मांडल्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेत प्रत्यक्ष पाहणी आणि मोजमाप सुरू केले. त्यामुळे आमच्या अनेक वर्षांच्या मागणीला आता न्याय मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. पुलाचे काम लवकर मंजूर होऊन प्रत्यक्षात सुरू व्हावे, हीच अपेक्षा आहे. आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवल्याबद्दल 'पुढारी'चे आरसुळे वस्तीतील ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.