बीड : राज्य शासनाकडून महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवासासाठी विविध सवलती देण्यात आलेल्या आहेत. या सवलतीचा लाभ घेण्याकरिता आता एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबलिटी कार्ड) अनिवार्य करण्यात आले आहे. हे कार्ड काढण्यासाठी बीडच्या बसस्थानकात सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होत असून हे कार्ड देण्यासाठी केवळ एकाच कर्मचाऱ्याची नियुक्ती असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी एनसीएमसी कार्ड सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने एनसीएमसी सेवेची सुरुवात केली आहे. हे कार्ड प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि कॅशलेस बनवणार आहे.
या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईविक्स टेक्नॉलॉजीस लि. आणि एनएसडीएल पेमेंट्स बैंक यांच्याशी करार केला आहे. हे कार्ड विद्यार्थी शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 'सरल' क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल, ज्येष्ठ नागरिक व महिला अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवासी यूडीआयडी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड. पुस्कारार्थी व पत्रकार स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण केले जाणार आहे.
यासाठीची प्रक्रिया सुरू असली तरी यंत्रणा मात्र अपुरी असल्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना सोसावा लागत आहे. बीडच्या आगारात सकाळी सात आठ वाजताच ग्रामीण भागातून ज्येष्ठ नागरिक येत आहेत, त्यांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत याच ठिकाणी ठाण मांडून बसावे लागत आहे. कार्ड मिळवण्यासाठी मोठी गर्दी होत असताना प्रक्रिया करण्यासाठी मात्र केवळ एकच कर्मचारी संबंधित एजन्सीकडून नियुक्त करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तासन्तास बसावे लागत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना या ठिकाणी थांबावे लागल्याने एखाद्या ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती बिघडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
आपले सरकारमध्ये उपलब्ध करून द्यावी सुविधा
एनसीएमसी कार्ड प्रदान करण्यासाठीची यंत्रणा संबंधित एजन्सीकडे आहे. त्या एजन्सीने आपले सरकारच्या माध्यमातून गावोगाव ही सुविधा उपलब्ध करून दिल्यास ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर सवलतधारकांना सोयीचे होऊ शकेल. ग्रामीण भागातून शहरात येण्याची वेळही येणार नाही तसेच वेगवेगळ्या ठिकाणी कार्ड मिळत असल्याने गर्दीही होणार नाही, त्या दिशेने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अधिकचे कर्मचारी नियुक्त करावेत
बीड शहर व तालुक्यासाठी बीड आगारातून कार्ड वाटप केले जात आहेत. परंतु या ठिकाणी केवळ एकच कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आठ आठ तास थांबावे लागत आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी केली जात आहे.