गेवराई ः मार्च महिन्याची चाहूल लागताच उन्हाची झळ वाढू लागते. सकाळपासूनच ऊन अंगाला चटका देऊ लागते आणि दुपारपर्यंत रस्त्यावरून जाणाऱ्यांची अवस्था काहिली होते. अशा वेळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक छोटेसे रसवंतीगृह अनेकांना दिलासा देणारे ठिकाण ठरते.
थंडगार उसाच्या रसाचा एक ग्लास घशाला गारवा देतो, थकलेल्या शरीराला नवी ऊर्जा देतो.परंतु त्या एका ग्लासामागे उभा असतो एक कष्टकरी माणूस दिवसभर उन्हात उभा राहून मेहनत करणारा रसवंती चालक. आताही उन्हाचा चटका वाढताच रसवंतीवरील गर्दी वाढू लागली आहे.
गेवराई शहरासह तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कडेला उन्हाळा सुरू होताच रसवंतीगृह पुन्हा उभी राहतात. मशीनमध्ये उसाच्या कांड्या टाकल्या की चाक फिरू लागते आणि त्याला बांधलेल्या घुंगरांचा खणखणाट वातावरणात घुमतो. तो आवाज ऐकून अनेकजण थांबतात, थंडगार रसाचा ग्लास घेतात आणि पुढे निघून जातात.पण त्या मशीनच्या मागे उभा असलेला माणूस मात्र दिवसभर तिथेच उभा राहतो .
उन्हात, घामात, धुळीत. रसवंती चालकांचा दिवस पहाटेपासून सुरू होतो. सकाळी बाजारातून ताजा ऊस आणणे, मशीन स्वच्छ करणे, बर्फ व लिंबूची व्यवस्था करणे अशी धावपळ सुरू असते. दुकान उघडल्यानंतर मात्र सूर्य माथ्यावर येईपर्यंत मशीन फिरतच राहते. हाताने उसाच्या कांड्या टाकत राहायच्या, चाक फिरवत राहायचे आणि ग्राहकांना गोड रस देत राहायचे.गेवराई येथील रसवंती चालक माऊली गिरी यांनी दिवसभर उन्हात उभे राहावे लागते. हात दुखतात, अंग दमते पण कुटुंबाचा संसार या रसावरच चालतो असे सांगितले.