पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व मागण्या पूर्ण कराव्या, असे आवाहन मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर उलथापालथ करावी लागेल. अचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका स्पष्ट करू, असेही जरांगे यांनी सांगितले. बीडजवळील नारायणगडावर जरांगे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच मराठा समाजाचा दसरा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.
सरकार काय करतय बघुया, त्यानंतर आपला निर्णय घेवू. डोळ्यासमोर अन्याय होत असेल तर उखडून फेकावच लागेल. त्यांनी आपल्याला फसवलं आहे. आचारसंहिता लागू द्यायची, तोवर सरकारवर विश्वास ठेवायचा. सर्व प्रश्न सोडवले नाहीत तर आचारसंहिता लागल्यानंतर मी जे सांगेल तसचं करायचं, असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले.
आपण गेल्या १४ महिन्यांपासून झुंजतोय. मला संपवण्यासाठीही अनेक षडयंत्र केली जात आहेत. मी फक्त माझ्या समाजासाठी सहन करत आहे. माझ्या समाजाचे उपकार कधीच विसरणार नाही. न्यायासाठी आपले आंदोलन सुरू आहे. आता झुकायचं नाही. अन्यायाविरोधात उठाव करावाच लागतो. संयम ठेवा विजय नक्की मिळणार, असेही जरांगे म्हणाले.