बीड

Manoj Jarange Patil: ‘आता मरण आलं तरी हटणार नाही, १०० टक्के मुंबई गाठणारच... कोण अडवतो बघतो'; मनोज जरांगे आंदोलनावर ठाम

प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाटोदा येथेच मुक्काम, श्रीगोंदा-हडपसर-खोपोली येथे मुक्काम न करता आंदोलन थेट आणि वेगाने पुढे नेण्याचा निर्धार

रणजित गायकवाड

Manoj Jarange Patil Maratha reservation press conference announcement

पाटोदा (बीड) : "आता मरण आलं तरी मागे हटणार नाही. माझ्या जिवाचं काहीही झालं तरी चालेल, पण मराठा आरक्षणाचा लढा थांबणार नाही. उद्या दुपारी ठीक १ वाजता मी मुंबईच्या दिशेने कूच करणारच," असा थेट आणि आक्रमक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात सरकारशी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

‘मला कोण आडवतं तेच बघतो!’

सरकारला थेट आव्हान देत जरांगे पाटील गरजले, "मी १०० टक्के मुंबईकडे जाणार म्हणजे जाणारच! मला कोण आडवतं ते आता मी बघतोच. आम्हाला रस्त्यात अडवण्याचा प्रयत्न झाला, तर लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत धडकेल. जर आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याची चूक केली, तर हे सरकार जागेवर कोसळल्याशिवाय राहणार नाही," असा घणाघाती इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

मुंबईत धडकण्याची तारीख लवकरच

मुंबईत कधी जमायचे यावर बोलताना ते म्हणाले, "मराठा समाजाने मुंबईत कधी यायचे याची तारीख मी आजच जाहीर करणार होतो. मात्र, सरकारचा मसुदा (ड्राफ्ट) आल्यामुळे मी तूर्तास तारीख जाहीर करण्याचे थांबवले आहे. ती तारीख लवकरच कळवली जाईल."

सरकारच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत, "सध्या मराठा समाजाच्या मनात प्रचंड आक्रोश आणि असंतोष खदखदत आहे," अशी संतप्त भावना त्यांनी बोलून दाखवली.

शांततेचे आणि शिस्तीचे आवाहन

आपल्या आक्रमक भूमिकेसोबतच जरांगे पाटील यांनी आंदोलक आणि समर्थकांना अत्यंत शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यावर कुठेही गाड्या उभ्या करू नका, वाहतुकीला अडथळा ठरेल असे वर्तन करू नका आणि आंदोलन शांततेत पण वज्रमुठीने पुढे न्या, अशा स्पष्ट सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

"सरकारशी लढताना गाफील राहून चालणार नाही, मला देवेंद्र फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकावाच लागतो," असा थेट आणि राजकीय बाणाचा घणाघाती वार करत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबई दौऱ्याच्या रणनीतीत मोठा बदल जाहीर केला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार होणारे श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली येथील मुक्काम आता होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारच्या हालचाली आणि डावपेचांना प्रत्युत्तर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे संकेत देत जरांगे पाटील म्हणाले, "समोरील रणनीती ओळखूनच पुढची पावले उचलावी लागतात. फडणवीसांच्या डावाला त्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्यासाठी हा बदल केला आहे."

नियोजित मुक्कामात बदल, दौऱ्याचा वेग वाढणार

मुंबईच्या दिशेने सुरू असलेल्या या ऐतिहासिक कूचदरम्यान श्रीगोंदा, हडपसर (पुणे) आणि खोपोली येथे मुक्काम न करता आंदोलन थेट आणि वेगाने पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या बदलामुळे मराठा आंदोलक अधिक आक्रमकपणे आणि कमी वेळात मुंबईच्या उंबरठ्यावर धडकण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

२९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला बसलेले जरांगे पाटील नियोजित दौऱ्यानुसार मंगळवारी (दि. १५) अंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना झाले होते. गेवराई आणि बीडमध्ये मराठा बांधवांनी त्यांचे वादळी स्वागत केले. त्यानंतर रात्री उशिरा २ वाजता पाटोदा येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. उपोषणामुळे खालावलेल्या प्रकृतीमुळे त्यांनी सभेत चिंता व्यक्त केली होती. "माझ्या पोटात प्रचंड आग पडल्यासारखी होत आहे, ही आग कमी झाली तरच पुढे जाणे शक्य होईल; दौऱ्यापेक्षा आरक्षण महत्त्वाचे आहे," असे त्यांनी नमूद केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT