बीड, पुढारी वृत्तसेवा : वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथे 1998 मध्ये लघु सिंचन प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र 1998 पासून संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा अद्याप मिळालाच नाही. त्यामुळे तीन शेतकरी हातबल झाले होते. शेतकऱ्यांनी अखेर कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने सर्व प्रकार समजून घेत चक्क जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्तीचे आदेश दिले. माजलगाव कोर्टाने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या वाहनाच्या जप्तीच्या आदेश काढल्यानंतर जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून गाडी जप्त करण्यात आली आहे. (Beed Collector News)
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतकरी शिवाजी टोगे, संतोष टोगे व बाबू मुंडे या शेतकऱ्यांची जमीन लघु सिंचन तलावासाठी शासनाने संपादित केली होती. या जमिनीचा अत्यंत तुटूपुंजा मावेजा त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी माजलगाव येथील सत्र न्यायालयात धाव घेत यासाठी दावा दाखल केला होता. या दाव्यावर कोर्टाने संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे अंशत: मान्य करून दि. २९ ऑक्टोबर २०१५ रोजी या शेतकऱ्यांना वाढीव मावेजा देण्याचा निकाल दिला होता. मात्र, शासनाने काही प्रमाणात रक्कम देऊन संपूर्ण रक्कम देण्यास चालढकल केली.
त्यामुळे सह दिवाणी न्यायाधीश यांनी या रकमेला व्याज लावून सदर रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दहा दिवसांपूर्वी पारित केले होते. त्यानुसार कोर्टाने वादी यांचे वकील यांना सोबत घेऊन मावेजाबाबत आपली बाजू मांडली व रक्कम अदा करण्यास सांगितले. मात्र, जिल्हाधिकारी यांनी पैशांची पूर्तता करू शकत नाही, तुम्ही गाडी घेऊन जा, असे सांगितल्याने कोर्टाने जिल्हाधिकारी यांची गाडी कायदेशीर बाबीची पूर्तता करून जप्त करून माजलगाव कोर्टात जमा केली. याप्रकरणी वादी शिवाजी टोगे, संतोष टोगे व बाबू मुंडे यांच्या वतीने अॅड. बाबुराव तिडके, एस.एस.मुंडे यांनी बाजू मांडली.