गेवराई : गेवराई तालुक्यातील मादळमोही गावाजवळील नगर रोडवर भरधाव वेगाने आलेल्या कारने यशराज हॉटेलसमोर चार वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाखापट्टणम हायवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असते. अशा गर्दीच्या ठिकाणी वेगात आलेल्या टाटा कंपनीच्या कारने नियंत्रण सुटल्याने समोरील वाहनांना धडक दिली. ही कार पाथर्डी बाजूकडून येत असल्याचे सांगितले जात आहे.
या अपघातात चंद्रकांत आंधळे, शहादेव आंधळे, यादव इंगोले आणि शिगटे यांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संदीप आंधळे यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून, अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे.