Fund of Rs 3 crore approved for bridge at Sonimoha
धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यातील सोनिमोहा येथील सोनी नदीवरील पूल गत पावसाळ्यातील मुसळधार पावसामुळे पूर्णपणे वाहून गेल्यानंतर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. पुलाच्या पुनर्बाधणीसाठी तब्बल ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सध्या निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गत पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे हा पूल खचून गेल्याने सोनिमोहा व परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि रोजंदारी करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. पर्यायी मार्गाने प्रवास करताना अनेक किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा फटका बसत होता.
या पार्श्वभूमीवर पुलाच्या पुनर्बाधणीसाठी शासन दरबारी सातत्याने मागणी होत होती. अखेर जिल्हा नियोजन विभागाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे २ कोटी ७७ लाख ते ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सध्या सुरू असून लवकरच ठेकेदाराची निवड होऊन प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ होईल, अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
नवीन पूल आधुनिक तांत्रिक मानकांनुसार व अधिक मजबूत पद्धतीने उभारला जाणार असून राहील, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. पूल पूर्ण झाल्यानंतर सोनिमोहा गावाचा इतर गावांशी संपर्क पुन्हा सुरळीत होणार असून विद्याथ्यर्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक आणि नागरिकांची दैनंदिन कामे अधिक सुलभ होणार आहेत.
परिणामी, ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक घडामोडींनाही गती मिळणार आहे. दरम्यान, या मोडकळीस आलेल्या पुलाची समस्या 'दैनिक पुढारी'ने ठळकपणे मांडत सातत्याने पाठपुरावा केला होता. या वृत्तांकनाची दखल घेत निधी मंजूर केल्याने स्थानिकांनी 'पुढारी'चे आभार मानले.
निविदा प्रक्रिया पूर्ण होताच कामाला गती
सोनिमोहा येथील सोनी नदीवरील पूल अत्यंत गरजेचा होता. या कामासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली आहे. ती लवकरच पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल असे उपअभियंता व्ही. बी. धोंगडे यांनी सांगितले.