गेवराई : तालुक्यात अधिकृत लोडशेडिंगच्या वेळेपेक्षा अनेकपट जास्त वेळ वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. जाहीर वेळापत्रक एक आणि प्रत्यक्षात तासनतास बत्ती गुल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वीज येते तेव्हा कमी दाबाने येत असल्याने लगेचच ‘डियू’ जाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी घरगुती वापरातील पंखे, कुलर, एसी यांचा उपयोगच होत नसून उकाड्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
सब-स्टेशनला फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांचा रोष अधिकच वाढला आहे. “लोडशेडिंगचा बहाणा करून जास्त वेळ लाईट बंद ठेवली जाते, आकड्यावर कधी कार्यवाही करणार साहेब?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे लहान मुले, वृद्ध व रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने तात्काळ दखल घेऊन नियमित वीजपुरवठा सुरळीत करावा, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.