बनावट कागदपत्रे तयार करून मंदिराची जमीन हडपली; माजी सरपंच पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल  file photo
बीड

बनावट कागदपत्रे तयार करून मंदिराची जमीन हडपली; माजी सरपंच पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

बीड तालुक्यातील गोलंग्री येथील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

नेकनुर : बीड तालुक्यातील गोलंग्री येथे खोटे दस्तऐवज तयार करून देवस्थानची ईनामी जमीन हडपल्याप्रकरणी माजी सरपंच पतीसह गावातील ७ जणांवर नेकनुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हनुमान देवस्थानची गट नंबर २५१ मधील ०९ हेक्टर ०८ आर जमीन बनावट कागदपत्रे व बनावट पीटीआर तयार करून माजी सरपंच पती तात्यासाहेब कवडे यांनी हडप करण्यात आल्याची लेखी तक्रार गोलंग्रीचे विद्यमान उपसरपंच श्रीकांत कवडे यांनी पुराव्यानिशी दिल्यानंतर अखेर गुन्हा दाखल झाला.

२०१२ ते २०१७ या कार्यकाळात तत्कालीन सरपंच मनिषा तात्यासाहेब कवडे यांचे पती तात्यासाहेब कवडे यांनी खोटे दस्तऐवज प्रशासनाला सादर करत दिशाभूल करून हनुमान देवस्थानच्या जमिनीची नोंद काढून त्याजागी मारोती मंदिराची जमीन अशी नोंद करण्यात आली व त्याच जमिनीचा ७/१२ व पीटीआर साम्य करून मारोती मंदिर या नावाने तयार करण्यात आला. विद्यमान उपसरपंच श्रीकांत कवडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी नेकनुर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिल्यानंतर अखेर तात्यासाहेब कवडे, पोपट कवडे, संतोष कवडे, प्रविण मते, शहादेव कवडे, सुदाम हिंदोळे, कलावती कवडे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल खटाणे अधिक तपास करीत आहेत.

कार्तिक वारीसाठीचा मदतनिधी हडपला : उपसरपंच श्रीकांत कवडे

पुर्वीपासून गोलंग्री ग्रामस्थ हनुमान देवस्थान जमिनीचा ११ महिन्यांसाठी जाहीर लिलाव करायचे. त्या लिलावातून आलेली रक्कम पंढरपूरला कार्तिकी वारीसाठी गावातून जाणाऱ्या लोकांना सहकार्य केले जात असे. परंतु २०१७ मध्ये तत्कालीन सरपंच पती तात्यासाहेब कवडे यांनी बनावट दस्तऐवज तयार करत मारोती मंदिर संस्थानच्या नावाने जमीन हस्तांतरित केल्यानंतर जुन्या सर्व गोष्टी बंद करून या ७ लोकांनीच ०९ हेक्टर ०८ आर जमीन ताब्यात घेऊन खात आहेत. त्याचा मोबदला गावाला किंवा पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी दिला जात नाही. त्यामुळे २०१७ पुर्वीप्रमाणेच ही जमीन गावकऱ्यांच्या स्वाधीन करण्याची मागणी गोलंग्रीचे उपसरपंच श्रीकांत कवडे यांनी ग्रामसभेचे ठराव घेऊन केली आहे.

बोगस पीक विमा भरून शासनाची ७ वर्षांपासून रक्कम लाटली

माजी सरपंच पती कवडे यांनी २०१७ मध्ये हनुमान देवस्थान जमिनीचे मारोती मंदिर नावाने बनावट कागदपत्रे तयार करून २०१७ पासुन आजतागायत खरीप आणि रब्बी दोन्ही पिकांचा विमा भरून उचलला असुन शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे सदरील जमीन शासन निगराणीत असुन तसा निकाल उपविभागीय अधिकारी बीड यांनी दिलेला आहे. तरीही इनाम देवस्थान जमिनीवर संस्थेच्या नावाने नव्हे तर स्वतःचे नाव लाऊन ७ वर्ष पिक विम्याची रक्कम लाटली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT