केज: संतोष देशमुख हत्या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांना का माहिती दिली नाही ? असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे तपास यंत्रणा एवढी गुप्तता का पाळत होत्या ? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी आमचा न्यायालयावर विश्वास असल्याची पुष्टी देखील त्यांनी जोडली आहे. (Santosh Deshmukh Murde Case)
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसा ढवळ्या अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीने अवघ्या ८० दिवसांत तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध मकोका न्यायालयात १८०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. तसेच यातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले की, स्वारगेट पुणे येथील बलात्कार प्रकरणी आरोपीला तत्काळ अटक केली. ही बाब अभिनंदनीय आहे. परंतु, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींची तत्काळ नाकेबंदी करून त्यांना ताब्यात घ्यायला हवे होते. इतकी तत्परता पोलिसांनी का दाखवली नाही. तसेच स्वारगेट बलात्कार प्रकरणी आणि पॉर्शे कार प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन वेळोवेळी माध्यमांना माहिती दिली. मात्र, संतोष देशमुख हत्या प्रकरणी अद्यापही माध्यमांना कोणतीही महिती दिली गेली नाही. त्यांनी गुप्तता का पाळली ? असा संशय व्यक्त केला. तसेच न्यायालयावर आमचा विश्वास असून आम्ही न्यायच्या प्रतीक्षेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.