केज : संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडी, एसआयटी आणि कोणत्याच तपास यंत्रणेवर आम्ही कधीही संभ्रम व्यक्त केला नाही. परंतु तपासा संदर्भातील माहिती, घडामोडी त्याचे अपडेट्स यांची माहिती आम्हाला मिळावी. अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट झाली असल्याने संभ्रम दूर झाला असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली. तसेच या हत्याकांडातील शेवटच्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. ही आमची भूमिका आहे. तर गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो असे ते म्हणाले.
या बाबतची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सीआयडी, एसआयटी आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदसीय न्यायालयीन समिती स्थापन केलेली आहे. त्या संदर्भात बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, आम्ही आता पर्यंत कोणत्याही तपास यंत्रणेवर संभ्रम व्यक्त केलेला नाही. तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करीत आहेत. मात्र तपासा संदर्भातील आम्हाला काही अपडेट्स आणि माहिती मिळत नव्हती; म्हणून गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दोन दिवसांपूर्वी सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी पाटील साहेब यांना आम्ही भेटलो. त्यांच्या मागे खूप काम असताना सुद्धा त्यांनी अगदी कमी वेळेत आम्हाला तपासा संदर्भात सर्व माहिती दिली.
आमचा मुख्यमंत्री आणि सर्व तपास यंत्रणा यांच्यावर विश्वास आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येत जातीवादाचा सबंध नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीला जात नसते. अशा प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत. देशमुख कुटुंबीय किंवा आमचे गावकरी यांनी कधीच जातीवादाचा मुद्दा उपस्थित केलेला नाही. आमची भूमिका ही न्यायाची असून या हत्येतील शेवटच्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा होवून त्याला फासावर लटकवले जावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच एसआयटीच्या नव्या समिती बाबत बोलताना ते म्हणाले की, काही अधिकाऱ्यांचे गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल झाले होते. म्हणून त्या समितीत फेरबदल करण्यात आला आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला अडथळा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य गावकऱ्यांकडून होणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.