धारूर ः धारूर घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरूच असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घाटातून प्रवास करताना जणू जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. घाट पार करणे म्हणजे मोठी लढाई जिंकण्यासारखे झाले आहे.
20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास धारूर मार्गे माजलगावकडे सिमेंट घेऊन जाणारा ट्रक घाटात पलटी झाला. सिमेंटच्या गोणी रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ टप्प झाली. इतर वाहनचालक प्रवाशांनी रस्त्यावरील सिमेंटचे पोते बाजूला सारत रस्ता मोकळा केला. या अपघातात वाहनचालक व त्याचा सोबती किरकोळ जखम झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूला घेतल्यामुळे दरीत कोसळण्याचा अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा घाटातील धोकादायक स्थिती समोर आली आहे.घाटातील अरुंद रस्ता, संरक्षण भिंती निकामी (संरक्षक कठडे), तीव्र वळणे, व सूचना फलकांचा अभाव यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रात्री व पहाटेच्या वेळी परिस्थिती अधिकच गंभीर बनते.
या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांना घरून फोन येतो - घाट पास केला का? एवढी भीती या मार्गाबाबत निर्माण झाली आहे. अनेक वेळा किरकोळ अपघात तर कधी मोठे अपघात घडत असून प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत.स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी केल्या जात असल्या तरी अद्याप ठोस निर्णय व कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या नाहीत.
लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून रस्ता रुंदीकरण, मजबूत बंदी उभारणी, योग्य ठिकाणी गतीरोधक, रिफ्लेक्टर व सूचना फलक लावणे, तसेच अवजड वाहनांसाठी वेळापत्रक ठरवणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. जोपर्यंत या घाटातील अपघातप्रवण परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय केले जात नाहीत, तोपर्यंत प्रवाशांचा जीव धोक्यातच राहणार आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.