Beed's Class 12 results have dropped by five percent
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात एकूण ४४ हजार ९९९ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती, त्यातील ४० हजार सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी ८८.९० एव्हढी आहे. गतवर्षी बीड जिल्ह्याचा निकाल ९३.४३ टक्के लागला होता, यावर्षी तो पाच टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले असून कॉपीमुक्ती अभियानाचाच हा परिणाम असल्याचे आता चर्चीले जात आहे.
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियान राबविण्यात आले होते. याचा परिणाम निकालामध्ये दिसून आला आहे, गतवर्षी बीडचा निकाल ९३.४३ टक्के लागला होता, तो यावेळी ८८.९० एवढा लागला आहे. संभाजीनगर विभागात गतवर्षी पहिला असलेला बीड जिल्हा यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
बीड जिल्ह्यात दरवर्षी बारावी बोर्डाच्या परिक्षेत कॉपीचा मुद्दा चर्चेत असतो. यावर्षी मात्र जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिक्षण विभागाला स्पष्ट निर्देश देत कॉपीमुक्ती अभियान प्रभावीपणे राबवले होते. अगदी प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही बसवण्याबाबतचे आदेश होते.
ज्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे शक्य नव्हते, त्या ठिकाणी झुम अॅपद्वारे नजर ठेवण्यात आली होती. यामुळे अगदी ग्रामीण भागात देखील कॉपीमुक्त वातावरणात परिक्षा पार पडल्या. त्याचा परिणाम आता निकालामध्ये दिसून येत आहे.
आतापासूनच अभ्यासाला लागा !
यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेदरम्यान प्रशासनाकडून कॉपीमुक्ती अभियान अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आले होते. ऐन परिक्षेच्या वेळी अशा पद्धतीने प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आल्याने सर्रास कॉपी चालणाऱ्या ग्रामीण भागातील केंद्रांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्या ठिकाणी कॉपीसाठी प्रवेश घेणाऱ्या पालकांनाही अचानकपणे हा 'धका' बसला होता. आता पुढील वर्षी देखील अशाच पद्धतीने कॉपीमुक्ती अभियान राबवले जाणार आहे.
३४२ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव
बीड जिल्ह्यात कॉपीमुक्ती अभियानादरम्यान अनेक ठिकाणी गैरप्रकार देखील आढळून आले होते. परिक्षेत कॉपी करतांना आढळलेल्या ३४२ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला असल्याची माहिती माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी दिली. तर दुसरीकडे गैरप्रकार होत असताना दुर्लक्ष करणाऱ्या १९ शिक्षकांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.