गजानन चौकटे
नवरात्र-दसऱ्याच्या सणासाठी लागवड केलेल्या झेंडू पिकाला यंदा कवडीमोल भाव मिळत असून गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे झेंडूची फुले सडून, कुजून व गुणवत्ताहीन होऊन गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी धार्मिक हंगाम लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली होती. बियाणे, खते, मजुरी व औषधांवर मोठा खर्च करून झेंडूचे पीक उभे केले, मात्र सलग पावसाने बागा नासल्या आणि रोगराईही पसरली.
गेवराई येथील बाजारात झेंडूच्या भावात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. सकाळी एका गाठडीला १०० रुपये भाव होते, परंतु दुपारी भाव पन्नास रुपयांपर्यंत कोसळला. बाजारपेठेत सतत पुरवठा आणि मागणीतील फरक, तसेच गुणवत्ताहीन फुलांची उलाढाल या कारणांमुळे भाव घटला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचा परिश्रम वाया गेला असून पंचनामे करून शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
“आमच्याकडे जवळपास चार हजार झेंडूची रोपे होती. साधारणपणे दीड टन फुले निघतात, पण यावर्षी अतिवृष्टीमुळे अवघे अडीच क्विंटल माल निघाला. सकाळी भाव चांगला होता, पण दुपारी पन्नास रुपये झाले. इतक्या खर्चानंतर एवढा कमी माल आणि तोही कमी भावात विकावा लागत आहे. त्यामुळे सगळा परिश्रम वाया गेला.”प्रमोद माळतकर
व्यापाऱ्यांचा म्हणणं आहे की, “सकाळी भाव चांगला होता कारण मागणी होती, पण दुपारी पुरवठा जास्त झाल्यामुळे भाव कोसळला. दर्जाहीन फुलांवर ग्राहक कमी पैसे देतात, त्यामुळे भाव सातत्याने खाली आला.”शेतकरी कोल्हेर