केज : केज - मांजरसुंबा रस्त्यावर उमरी फाट्याच्या जवळ असलेल्या टोलना क्यावर २० कि.मी. अंतरातील शेतकरी आणि चारचाकी वाहनांना टोलमुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी ११.३० वाजता पाऊण तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
दी. १४ जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली केज - मांजरसुंबा महामार्गावर उमरी फाटा येथील टोल नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावर केज तालुक्यातील उमरी शिवारात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या वतीने एचपीएम कंपनीने टोल नाका चालु केला आहे. सदर टोल नाक्या वरून २० कि.मी. अंतरावरील स्थानिक चार चाकी वाहने, शेतकऱ्यांचा शेतीमाल वाहुन नेणारे वाहने यांना सारखे ये-जा करावे लागते.
या टोल नाक्यावर प्रत्येक फेरी दरम्यान टोल वसूल केला जातो. हे अन्यायकारक असून प्रत्येक वेळी टोल वसुली करणे म्हणजे स्थानिकांची आर्थिक लूट आणि अन्याय केल्या सारखेच आहे. त्यामुळे संबंधित कंपनीस पत्रव्यवहार करून तात्काळ टोल नाक्याच्या २० कि.मी. अंतराच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या, चारचाकी वाहनांना संपूर्णपणे टोल मुक्ती देण्यात यावी. या मागणीसाठी मंगळवार दि.१४ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता उमरी टोल नाका येथे क्रांतिकारी शेतकरी संघटना व स्थानिक वाहन धारक, शेतकऱ्यांच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाऊण तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यामुळे छत्रपती संभाजीनगर, पुणे, लातूर, अहमदनगर, अंबाजोगाई, बीड, जालना, अहिल्यानगरकडे जाणारी वाहने खोळंबून थांबली होती.
यावेळी केज पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम आणि त्यांचे सहकारी हे बंदोबस्ताला उपस्थित होते. तर मंडळ अधिकारी लक्ष्मण ढाकणे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. या आंदोलनात ॲड. कुलदीप करपे यांच्यासह युवा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अतुल गवळी, शहराध्यक्ष फेरोज पठाण, अजय वाघमारे, दादासाहेब गुंड, बाबासाहेब देशमुख, अमोल चौधरी, मोहन ढाणे, बालाजी घुले, सोनू सुर्यवंशी, पिनू गोरे, किरण चाळक यांच्यासह शेतकरी, वाहन धारक व वाहन चालक सहभागी झाले होते