धारूर : खामगाव–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केजजवळ साने गुरुजी विद्यालयासमोरील पुलाजवळील रस्त्यावर मोठमोठे व जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. मात्र, याकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या धोकादायक परिस्थितीबाबत केज -धारूर येथील नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठविला. विविध माध्यमांतून तक्रारी करण्यात आल्या तसेच आंदोलनेही करण्यात आली. वृत्तपत्रांमधून वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही संबंधित यंत्रणा आणि जबाबदार लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अखेर धारूर तालुक्यातील चोरांबा येथील जागरूक ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वखर्चातून आणि श्रमदानाच्या माध्यमातून भरपावसात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. प्रशासनाने करावयाचे काम ग्रामस्थांना करावे लागल्याने शासन व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असले, तरी राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना पुढे यावे लागणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने या मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले असून, प्रशासनाने तातडीने जागे होऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.