दिंद्रुड : बीड–परळी महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामामुळे उडणाऱ्या धुळीचा फटका रस्त्यालगतच्या शेतीला बसत असून, धारूर तालुक्यातील भोपा येथील एका शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्याने सोमवारी स्वतःच्या शेतातील पपई व मिरचीची उभी पिके अक्षरशः उपटून टाकली.
बीड–परळी महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, तिचा परिणाम रस्त्याशेजारील पिकांवर होत आहे. भोपा येथील शेतकरी रवी वाघचौरे यांनी सव्वा एकर क्षेत्रात मार्च महिन्यात पपई व मिरचीची लागवड केली होती. मात्र, रस्त्यावरील धूळ सतत पिकांवर साचत गेल्याने पिकांना विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला.
पिकांवर अनेक वेळा औषध फवारणी करूनही अपेक्षित परिणाम झाला नाही. धूळ पानांवर साचल्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. परिणामी पिकांची वाढ खुंटली आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता कमी झाली. अखेर उत्पादनाची आशा संपुष्टात आल्याने शेतकरी रवी वाघचौरे यांनी पपई व मिरचीची रोपे उपटून टाकली.
या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ते काम करणाऱ्या यंत्रणेकडून नियमित पाणी फवारणी करण्यात आली असती, तर धुळीचा त्रास कमी होऊन हे नुकसान टळू शकले असते, अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, पीडित शेतकरी नुकसानभरपाईची मागणी करत असून, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
धारूर तालुक्यातील जवळा शिवारातील गट नंबर 530 शेतात अडीच एकर नागनाथ ज्ञानोबा जाधव यांनी पपई लावलेली होती. धुळीच्या प्रादुभाने उभे फळ नासत आहेत. चिंताग्रस्त शेतकऱ्यांसमोर ही झाडे उपटल्याशिवाय आता पर्याय उरला नाही.