माजलगाव: माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे पाच दरवाजे उघडून सिंधफना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सकाळी ११:१५ वाजता धरणातून ९,८८६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले, ज्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात अविरत पाऊस पडत असल्यामुळे पाण्याची आवक प्रतिसेकंद ११,००० क्युसेक इतकी वाढली आहे. यामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने, धरणाची सुरक्षितता आणि पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करणे आवश्यक झाले. रात्री १० वाजता धरणाचे तीन दरवाजे उघडून ५,९३२ क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. परंतु पाण्याची आवक कमी न झाल्याने, सकाळी ११:१५ वाजता आणखी दोन दरवाजे उघडून एकूण पाच दरवाजांतून ९,८८६ क्युसेकने पाणी सिंधफना नदीपात्रात सोडण्यात आले. पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता गणेश झापुडगे यांनी दिली.
सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी अधीक्षक अभियंता पल्लवी जगताप आणि कार्यकारी अभियंता जयंत इनामदार यांनी धरणावर तळ ठोकला आहे. उपविभागीय अभियंता सोनवणे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. नागरिकांनी नदीकाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.