बीड: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन व मावेजा कोट्यवधी घोटाळा प्रकरणात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून पोलिसांनी अटक केली आहे. ही माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी फोनवरून दिली.
अविनाश पाठक यांना अटक केल्यानंतर बीडच्या न्यायालयात हजर केले जाईल. या अगोदर अविनाश पाठक यांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली होती. एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात दहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना एसआयटीने आज (दि.७ मे) तकलीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनाच ताब्यात घेतल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यात भूसंपादनच्या कथित घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर यात अविनाश पाठक यांचा देखील समावेश होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक पूजा पवार करीत होत्या. त्या सध्या रजेवर असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास एम. व्यंकटराम यांच्याकडे आला होता. अखेर लातूरमधून अविनाश पाठक यांना लातूर मधून ताब्यात घेण्यात आले आहे. लवकरच बीड न्यायालयात हजर केले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली..