गौतम बचुटे
केज : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यातच नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेरणीनंतर बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, दुसरीकडे खरेदी केलेले बियाणेही सडलेले निघाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
६५ हजार हेक्टरवरील सोयाबीन संकटात
केज तालुक्यात यंदा ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. साळेगाव, नांदुरघाट, युसुफवडगाव, बनसारोळा, तांबवा आणि मांगवडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी महाबीज आणि जे.एस. कंपनीचे बियाणे पेरले होते. मात्र, बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी तातडीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी नोंदवल्या. या तक्रारींच्या आधारे उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड, केव्हीकेचे शास्त्रज्ञ प्रा. अरुण गुट्टे आणि कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली.
दुबार पेरणीतही फसवणूक
साळेगाव येथील शेतकरी संदीपान टोपे यांनी आदिती कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेले बियाणे न उगवल्यामुळे पुन्हा महाबीज (६१२ वाण) खरेदी केले. मात्र, पेरणी करताना त्यांना बियाणे सडलेले आणि खराब असल्याचे आढळले. हे खराब बियाणे त्यांनी स्वतंत्रपणे निवडून ठेवले आहे. टोपे दाम्पत्याने सांगितले की, "आम्ही योग्य बीजप्रक्रिया करून ५ बॅग सोयाबीन पेरले होते. दहा दिवसांनंतरही उगवण झाली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या पेरणीसाठी आम्हाला सुमारे ८० हजार रुपयांचा खर्च आला असून, सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी." संदीपान टोपे यांच्यासह सौरव वरपे, एकनाथ इंगळे, जयश्री टोपे, मुकेश गित्ते, कैलास पटणे, शफीक सय्यद आणि भागवत तिडके या शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
"आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली असून प्रथमदर्शनी बियाण्याची उगवण क्षमता कमी असल्याचे दिसून येत आहे. संबंधित लॉटचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत."प्रा. अरुण गुट्टे (कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र)
"तालुक्यात आतापर्यंत ७० हजार हेक्टर पेरणी झाली असून त्यापैकी ६५ हजार हेक्टरवर सोयाबीन आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार न उगवलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत."सागर पठाडे (तालुका कृषी अधिकारी, केज)